- गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून पाणी अचानक सोडल्याने वैनगंगा नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती
- नदीच्या मध्यभागी असलेल्या ट्रॅक्टरमध्ये असलेल्या तिन जणांनी दोराच्या सहाय्याने उडी मारून जीव वाचवला
- पाणी सोडण्याची पूर्वसूचना न दिल्याने हा प्रसंग ओढवला होता
अभय भुते
वैनगंगा नदीत एक ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नशिब चांगले म्हणून त्या ट्रॅक्टरमध्ये असलेल्या तिन जणांचा जीव वाचला आहे. भंडारा जिल्हा प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेज येथून पाणी सोडण्यात आले. अचानक सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्याच वेळी एक ट्रॅक्टर नदीच्या पात्रात होता. पाणी वाढत आहे हे लक्षात आल्यानंतर ट्रॅक्टर किनारी येण्यासाठी निघाला. मात्र नदीच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर पाणी जास्तच वाढले. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये असलेल्या तिघांनी उड्या घेत कसा-बसा किनारा गाठला. ट्रॅक्टर पाण्याच्या धारांमध्ये वाहून गेला.
गोंदिया जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा तीन जणांच्या जीवांवर बेतला असता. मोहाडी तालुक्यातील माडगी येथे असलेल्या वैनगंगा नदीवर रेल्वेचा पूल आहे. पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे आवश्यक ते साहित्य ट्रॅक्टरने तिथे पोहोचवले जाते. त्याचा ठेका माडगी येथील आनंद बुधे यांना दिला आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणे आवश्यक ते साहित्य घेवून ते वैनगंगा नदी पात्रातून रेल्वे पुलाखाली पोहोचले होते. दिवसभर काम झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास परतण्याच्या वेळी झाली होती. त्याच वेळी अचानक वैनगंगेच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला.
आतापर्यंत कोरडी असलेल्या वैनगंगेत अचानक पाणी वाढले. पाण्याचा वेग ही जास्त होता. हे पाहून ट्रॅक्टरसह तीन जण परत निघाले होती. नदी पत्रातून किनाऱ्याकडे जात असताना प्रचंड वाढलेल्या पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर मधोमध येऊन फसला. ट्रॅक्टर पुढे सरकत नव्हता. ट्रॅक्टरमध्ये राहीलो तर वाहून जाण्याची भिती होती. त्यामुळे त्या तिघांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या दोराच्या सहाय्याने त्या तिघांनी आपला जीव वाचवला. ट्रॅक्टर मात्र पूर्णपणे पाण्याखाली गेला. प्रसंगावधान दाखविल्याने तिघांचे प्राण वाचले.
या घटनेनंतर गोंदिया जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. या जिल्ह्यातील धापेवाडा प्रकल्पातून सकाळीच नऊ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. दुपारनंतर पाण्याचा वेग वाढविण्यात आला. मात्र घटना घडून गेली तरीही भंडारा जिल्हा प्रशासनाला कोणतीही सूचना दिली गेली नव्हती. त्यामुळे दोन जिल्ह्यात कोणताही समन्वय नसल्याचं समोर आले आहे. जर वेळीच ते तिघे बाहेर पडले नसले तर मोठा अनर्थ घडला असता.