"कागलच्या भविष्यासाठी पक्ष बदलला", समरजीत घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश

शरद पवार यापुढे जो आदेश देतील त्याप्रमाणे आपण काम करणार आहोत. या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर शरद पवारांच्या नेतृत्वात आपल्याला इथे परिवर्तन घडवायचं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोल्हापुरात मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरातील कागल मतदारसंघातील समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. कागलच्या भविष्यासाठी पक्ष बदलला, असं समरजीत घाटगे यांनी म्हटलं आहे.  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 

पक्षप्रवेशानंतर बोलताना समरजीत घाटगे यांनी म्हटलं की, कागल आणि गडहिंग्लजच्या भविष्यासाठी मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळातील परिवर्तनासाठी हा निर्णय घेतला आहे. कुणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघात विजयासाठी मी हा निर्णय घेतला आहे. पावसातही एवढी गर्दी येथे जमली आहे. त्यामुळे लोकांना कागलमध्ये परिवर्तनाचा ठाम विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे. 

शरद पवार यापुढे जो आदेश देतील त्याप्रमाणे आपण काम करणार आहोत. या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर शरद पवारांच्या नेतृत्वात आपल्याला इथे परिवर्तन घडवायचं आहे. शरद पवारांमुळे आपल्याला हत्तीचं बळ मिळालं आहे. घरोघरी तुतारी पोहोचवून कागलमध्ये सुराज्य निर्माण करायचं आहे, असा संदेश समरजीत घाटगे यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

ही जागा वस्तादची 

शरद पवारांनी सभा घेऊन हा पक्षप्रवेश केला, ही मोठी गोष्ट आहे. गैबी चौक इथं सभा घेण्याचा निर्णय देखील शरद पवारांचा होता. ही जागा वस्तादची जागा आहे, हे आठवण करुन देण्याची गरज आहे. कागलच्या पुरोगामी विचाराला पुढे घेऊन जायचं आहे. तुतारी घेऊन कागल मतदारसंघाच परिवर्तन करायचं आहे, असं समरजीत घाटगे यांनी म्हटलं.  

Advertisement

जयंत पाटील गैबी चौकात विजयी सभा घेतील

गेल्या विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. याची आठवण करुन देताना घाटगे यांनी म्हटलं की, गेल्यावेळी जयंत पाटील यांनी याच गैबी चौकात माझा कार्यक्रम केला होता. आता याच चौकात विजयासाठी सभा जयंत पाटील घेतील.

Topics mentioned in this article