अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News : राज्यात आखाती युद्धाच्या झळा घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरला मोठ्या प्रमाणात अद्यापही बसत आहे. राज्यातील कित्येक जिल्ह्यात ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बुलढाण्यात नागरिकांना सिलिंडरसाठी रात्री दोन वाजेपासून रांगेत उभं राहावं लागत आहे.
रात्री दोन वाजेपासून रांगेत....
बुलढाणा जिल्ह्यातील मुख्यालयात जिल्ह्याचा गाडा चालवणारे जिल्हाधिकारी असतात, पुरवठा अधिकारी असतात तिथेच नागरिकांना रात्री दोन वाजेपासून रांगेत उभं राहून देखील सिलिंडर मिळत नसल्याने प्रशासन नेमकं करतंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे आज रमजान ईद आहे. ईदीच्या दिवशीही मुस्लीम बांधवांना गॅस सिलिंडरचा फटका बसल्याचं दिसून येत आहे. या सर्व बाबींवर गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सर्व काही सुरळीत असल्याचं सांगत आहेत. मात्र ग्राहकांच्या लांबच लांब रांगा वेगळंच सांगत असल्याचं दिसत आहे. सरकारकडून मात्र घरपोच गॅस सिलिंडर दिलं जाईल, कोणीही रांगा लावू नका असं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांकडून रात्री दोन वाजेपासून रांगा लावल्या जात असल्याचं दिसत आहे. घरपोच गॅस सिलिंडर मिळत असतं तर त्यांच्यावर रांगा लावण्याची वेळ आली असती का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
६०० सिलिंडरचं बुकिंग अन् ९०० चा कोटा तरीही रांगा का?
मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीला ९०० सिलिंडरचा कोटा आहे. मात्र प्रत्यक्षात ६०० सिलिंडरचं बुकिंग झालेलं आहे. तरीही रांगा का लावल्या जात आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नागरिक रात्री २ वाजता रांगेत उभे राहतात आणि सकाळी ९ वाजता कार्यालय खुलं होतं. म्हणजे तब्बल ७ तास नागरिकांना सिलिंडर मिळविण्यासाठी रांगेत उभं राहावं लागत असल्याचं ग्राहकांच्या प्रतिक्रियेवरुन समोर आलं आहे.