पितृपक्ष सुरू पण कावळे कुठं आहेत? राज्यातील धक्कादायक परिस्थितीचा Ground Report

Advertisement
Read Time: 4 mins
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

गणेश विसर्जनानंतर पितृपक्ष सुरु झाला आहे. पण, राज्यात अनेक ठिकाणी कावळे गायब आहेत. कावळे कुठे आहेत? हा एकच प्रश्न सारे विचारत आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर काही वर्षांनी कावळे डोळ्यांना दिसणार नाहीत, अशी भीती संशोधक आणि पक्षी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कुठे गेले कावळे? पुढच्या पिढ्यांना काऊ चिऊची गोष्ट सांगण्यापुरते तरी कावळे दिसावेत यासाठी काय करावे लागेल, पाहूया विशेष रिपोर्ट

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पक्षी संशोधक आणि नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात पक्षी विभाग प्रमुख असलेले डॉ. मुकुंद कदम सांगतात की, 'कावळ्याचे प्रमाण नक्कीच कमी झालेले आहे. काही वर्षांनंतर कावळे दिसणार देखील नाहीत. या विषयावर झालेले संशोधन हेच सांगत आहे. काही शहरे आणि गावे जिथे अनुकूल वातावरण आहे तिथे कावळे दिसतात, पण कमी प्रमाणात. मुंबई शहरात हवामान अनुकूल आहे, मासे मिळतात किंवा उघड्यावरील उकिरड्यावर काही मिळतं म्हणून कावळे दिसतात. काही गावांत दिसत असतील. मात्र, महाराष्ट्रात इतरत्र सहसा दिसत नाहीत. मानवी सहजीवनाचे पिढ्या न पिढ्या सख्खे सोबती असलेल्या चिमण्या आणि कावळे दिसेनासे झालेत ही आजची दाहक वस्तुस्थिती आहे.' 

कावळे नेमके गेले कुठे? या प्रश्नावर डॉ.कदम सांगतात की,'मुळातच त्यांचे प्रमाण फार कमी झाले, आणि जे उर्वरित कावळे आहेत त्यांनी आपली गृहस्थाने (habitat) बदलली आहेत. ती जंगलात खोलवर किंवा एखाद्या टेकडीवर किंवा ग्रामीण भागात कुठेतरी अशा ठिकाणी गेली आहेत.. जिथे त्यांना तुलनात्मकदृष्ट्या अधिक अनुकूल वातावरण आहे.

( नक्की वाचा : Video : पुण्यातले रस्ते उंदीर, घुशींनी पोखरले? सिटी चौकातील घटनेमुळे पुणेकर धास्तावले! )
 

समस्त कावळ्यांनी मानवा सोबत हजारो वर्षांच्या सहजीवनातून असे बहिर्गमन करण्याचा असा निर्णय कां बरे घेतला असावा? याचं उत्तरही डॉ कदम यांनी दिलं आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात असं संशोधनातून पुढं आलं आहे.  मोठ्या प्रमाणात जंगलतोड किंवा वृक्ष तोडीमुळे कावळ्यांना अधिवास मिळत नाही. शिवाय त्यांची खास आणि वैशिष्टयपूर्ण घरटी बांधायला त्यांना हवी ती काडी - काटकी मिळत नाहीत कारण ती झाडे झुडपी आपण कधीच हद्दपार केली आहेत. आपल्या शेतात वापरली जातात ती किटनाशके आणि घातक रसायने आपल्या अन्नात पोहोचलेली आहेत. त्यांनी जसे गिधाडे दिसेनाशी झालीत तसेच काहीसे कावळ्यांच्या बाबतीत घडत असावे. 

मोबाईलच्या टॉवर्स मधून निघणारी कंपने त्यांना शहरातून बाहेर करताहेत असे सुचविणारे संशोधन झाले आहेत. या सर्व कारणांवर आणखी संशोधनांची गरज आहे. पण मुख्य म्हणजे आपण त्यांची खाण्याची सवय (eating habit) बदलण्यास कारणीभूत ठरलो आहोत, हे देखील खरेच. मुळात, निसर्गात संघर्ष करून, मेहनत करून अन्न मिळविणे हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मात्र, आपण देखील त्यांना सहज काही तरी देतो, आणि कित्येक वेळा आपण भूत दया मानून दिलेले ते काही तरी त्यांच्यासाठी, त्यांच्या पचन क्रियेसाठी चांगले नसते. 

( नक्की वाचा : रविंद्र चव्हाणांना वाढदिवशीच कुणी डिवचलं? डोंबिवलीत लागलेल्या बॅनरमुळे खळबळ )
 

काय होतील परिणाम?

सर्वच पशू पक्षी अन्न साखळीत महत्वाचे घटक आहेत, तशी गिधाडे, चिमण्या आणि कावळ्याची भूमिका देखील महत्त्वाची आहे. पण, ते दिसेनासे झाल्या नंतर ते सहज जाणवणार नाही. त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसायला वेळ जावा लागतो. कावळा हा निसर्गाचा स्वच्छताकर्मी आहे. मेलेला उंदीर दिसला की काही मिनिटात तो ते उचलून घेऊन जातो. पण, आपण आज ज्या पध्द्तीने शहरात स्वच्छता राखतो,  किंवा घरातले उष्टे अन्न पॅकेट मध्ये घालून कचऱ्याच्या डब्यात ठेवतो त्यामुळे त्याला अपेक्षित अन्न साहजिकच मिळत नाही. ते मिळत नाही म्हणून तो फिरकत नाही.. तो येत नाही म्हणून आपल्याला स्वतःला किंवा आपण नेमलेल्या स्वच्छ्ता कर्मीला कष्ट करून असा कचरा उचलावा लागतो.. अशा दोन्ही बाजू या समस्येला आहेत.

काय उपाय करावे लागणार?

पुढच्या पिढ्यांना देखील कावळ्याचे दर्शन व्हावे यासाठी काय करता येईल, असे विचारले असता डॉ मुकुंद कदम म्हणतात, 'चिमण्या कावळ्यांना आपल्या परसदारी किंवा अंगणात पुन्हा आमंत्रित करणे सोपे काम नाही. तसेच ते एकट्याने किंवा दुकट्याने होणारे नाही. ही सम्पूर्ण समाजाची जवाबदारी आहे. त्याकरिता एक दोन संशोधक नाही तर संपूर्ण समाजाला जागरूकता निर्माण करावी लागेल.
पुढच्या पिढीत पक्षी साक्षरता निर्माण होण्यासाठी त्यांना पक्षी निरीक्षक व्हावे लागेल. पितृपक्ष सारख्या प्रथेतून आपल्या पूर्वजांना कदाचित हे देखील अपेक्षित असावे.'
 

Topics mentioned in this article