Devendra Fadnavis's Masterstroke Resolves Maratha Reservation Crisis: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण द्यावं या मागणीसाठी सुरु असलेलं आंदोलन अखेर संपलं. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु केलं होतं. जरांगे पाटील आणि आंदोलकांनी गेले काही दिवस या विषयावर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही, असं जरांगे पाटील यांनी घोषणा केली होती. त्याचवेळी या आंदोलनामुळे मुंबईकरांना होत असलेल्या त्रासावर मुंबई उच्च न्यायालयानं कठोर मत व्यक्त केलं होतं. त्यामुळे हा तिढा आणखी किती चिघळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, अखेर पाचव्या दिवशी जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील चर्चा यशस्वी झाली. 'तुमचं आमचं वैर संपलं' असं जाहीर करत जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागं घेतलं.
मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. पण, मराठा आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागे राहून केलेल्या अचूक नियोजनामुळेच यश मिळाले, असे समोर आले आहे. आंदोलनादरम्यान वैयक्तिक टीका आणि टीकेला सामोरे जावे लागले असले, तरी त्यांनी संयम राखत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कायदेशीर आणि प्रशासकीय तयारी
मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन सुरू असतानाच कायदेशीर बाबींवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीसोबत 4 बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने एक ठोस मसुदा तयार केला गेला. प्रत्येक संभाव्य निर्णयासाठी GR (शासकीय निर्णय) तयार ठेवण्यात आला होता. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरच मंत्रिमंडळ उपसमितीला चर्चेसाठी पाठवण्यात आले.
( नक्की वाचा : Maratha reservation : 'कुणबी' दाखल्यासाठी अर्ज कसा कराल? वाचा सरकारी GR मधील संपूर्ण माहिती, सोप्या शब्दात! )
अचूक नियोजनाचे यश
फडणवीस यांनी तयार केलेला मसुदा इतका परिपूर्ण होता की, आंदोलक नेते मनोज जरांगे यांना तो पहिल्याच बैठकीत मान्य करावा लागला. त्यामुळे चर्चेच्या अनेक फेऱ्या कराव्या लागल्या नाहीत आणि वेळ वाचला.
संयम आणि कामावर लक्ष
आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्यात आले, त्यांच्यावर अनेक शिवीगाळ झाली, परंतु त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. कोणताही तोल न गमावता त्यांनी आपले नियमित कार्यक्रम सुरू ठेवले.
( नक्की वाचा : Manoj Jarange Patil Morcha : सरकारचा प्रस्ताव जरांगेंना मान्य, 'या' मागण्यांवर झाली सहमती, वाचा सविस्तर )
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवात त्यांनी दरवर्षीप्रमाणे सहभाग नोंदवला. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. वाहिन्यांवरील गणपती आरतीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने चुकीचा संदेश जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही.
या यशस्वी वाटाघाटींमुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राज्याच्या इतिहासात अधिक मजबूत झाली आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मराठा आरक्षण देणारे, ते टिकवणारे आणि आज पुन्हा मराठा आंदोलन यशस्वीपणे सोडवणारे नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.