Dhananjay Munde Speech: भगवान भक्तीगडावर आज धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी धनंजय मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या स्मृती आजही डोळ्यात पाणी आणतात, अशा शब्दांत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मेळाव्याच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या मोठ्या संकटाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, पूर आला. शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आलं आहे. मी आज जरी मंत्रिमंडळात नसलो, केवळ आमदार असलो, तरी माझ्या बहिणीशी चर्चा झाली आहे. शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो."
मुंडे कुटुंबाची दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवल्याबद्दल त्यांनी आपल्या दोन्ही बहिणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे कौतुक केले. "साहेब गेल्यानंतर ही दसऱ्याची परंपरा माझ्या दोन्ही बहिणींनी कायम सुरू ठेवली याचा मला माझ्या दोन्हीही बहिणींचा अभिमान वाटतो. भगवान गडाला मिळालेली 10 एकर वन विभागाची जागा ताईच्या आणि माझ्या प्रयत्नाने मिळाली", अशी माहितीही त्यांनी दिली.
(नक्की वाचा - Sharmila Thackeray: दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना शर्मिला ठाकरेंचं 'सरप्राईज', पाहा VIDEO)
आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, मी विद्यार्थी चळवळीपासून जाती-जातीच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढणारा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, याचा आपल्याला आनंद आहे. कारण, मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीत मी स्वतः होतो. मात्र धनंजय मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का देण्याच्या प्रयत्नांवर तीव्र आक्षेप घेतला. आरक्षण दिलंय आणखीन द्या आमचं, काही म्हणणं नाही. मात्र याच्या ताटातलं काढून त्याला देणे योग्य नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
मीडिया ट्रायल सुरु असताना बहिणींना आधार दिला
यावेळी धनंजय मुंडे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील राजकीय चढ-उतारांवरही बोलले. माझ्यावर मीडिया ट्रायल होत असताना, माझी बहीण मला आधार देत होती, अशी भावनिक आठवण त्यांनी सांगितली. "मला कोर्टातून क्लीन चीट दिली आणि समोरच्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. तरीही मी आज शिक्षा भोगतोय."
भाषणाच्या शेवटी त्यांनी बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना जातीपातीचे समीकरण मिळून बदलायचे आवाहन केले. जातीमुळे एकमेकांची मैत्री तुटलीय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. "आग लगी थी मेरे घर, सब पुछने वाले आये हाल पूछा और चले गये... एक सच्चे दोस्त ने पूछा क्या बचा है? मैने कहाँ कुछ नहीं केवल मैं बचा गया हूँ...फिर उसने गले लगा कर कहाँ दोस्त...फिर जला ही क्या हैं?", अशी शायरी म्हणत त्यांना भाषणाचा शेवट केला.