आम्ही हिंदू धर्मात असूनही आमच्यावर अन्याय होत आहे. हिंदूवादी सरकार असून सुद्धा आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. उलट या प्रकरणी चालढकल केली जात आहे. असा आरोप करत आम्हाला सरकारने आता हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीने एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण नक्की काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे.
हा सर्व प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडला आहे. मातंग समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, असा आरोर मातंग समाजाचा आहे. त्यामुळे मातंग समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कळंब ते तुळजापूर अशी पायी पदयात्रा काढली. या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, समाज बांधव सहभागी झाले होते.
ही पदयात्रा तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात दाखल झाली. त्यावेळी इथं मोठा गोंधळ उडाला. तुळजाभवानी मंदिरासमोर आरती करण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे सुरक्षा रक्षकांनी थांबवण्यात प्रयत्न झाला. यावेळी धक्काबुक्की झाली. शिवाय वाद निर्माण झाला. याचबरोबर मंदिरात प्रवेश नाकारला गेल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आई तुळजाभवानीची आरती करून सरकारला सुदबुद्धी यावी, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांनी यावेळी केली. या आंदोलनामुळे मंदिर महाद्वार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलीस दल तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.