धाराशिव: पवनचक्कीच्या वादातून धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवनचक्की कंपनीकडून शेतात उभ्या केलेल्या विद्युत् टॉवरचा योग्य मावेजा मिळावा अशी माफक अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी लाठ्यांसह शेतातील उसाने अमानुष मारहाण केली आहे. यावेळी पोलिसांनी थोडीही दयामाया न दाखवता शेतकऱ्यांना चक्क लाथाखाली तुडवत मारहाण केली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे. पवनचक्की विद्युत लाईन टॉवर चा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा अस म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर काल सायंकाळी 6 च्या सुमारास पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. सदरील घटना वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात घडली.
गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे २ टॉवर गेले आहेत. एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळाला आहे तेवढंच मावेजा दुसऱ्या कंपनीने द्यावा अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती. त्यामुळे त्यांनी टॉवर चे काम थांबवले होते. मात्र पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मवेजा देण्याच्या ऐवजी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली. आणि कुठलीही भीड भाड न राखता लाठी काठी अन् उसाने शेतकऱ्यांना हाणामारी करण्यास सुरुवात केली.
यावेळी भाजपाचे वाशी येथील नगरसेवक राजु कवडे यांनी मध्यस्ती करन्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मात्र शेतकरी आणि भाजपा नगरसेवक राजु कवडे यांच्यावर देखील अमानुष लाठीमार केला. भाजपचे हे नगरसेवक ज्वलनशील पदार्थ घेऊन आले होते. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी लाठी चार्ज केल्याचे सांगत पोलिसांनी हात वर केलेत. शिवाय पोलिसांनी तीन जणांविरोधात शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा देखील नोंद केला आहे.
नक्की वाचा - Beed Crime : मुलगा जिवंत हवा असेल तर 50 हजार टाका, अन्यथा... बीडमधील धक्कादायक प्रकार
ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड हे देखील याच ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडलाय. राठोड यांच्याकडून घडलेला हा पहिला प्रकार नाही. राठोड हे सतत वादग्रस्त राहिलेले अधिकारी असून, प्रत्येक ठिकाणी आपल्या पोलीस खाकीचा त्यांनी गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. धाराशिव शेतकरी मारहाण प्रकरणात देखील त्यांची शेतकऱ्यांवर दादागिरी पाहायला मिळाली. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा अस म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर राठोड यांच्या फौज फाट्यातील पोलिसांनी थेट लाठ्या चालवल्या. राठोड यांची कारकिर्द वादग्रस्त असून यापूर्वीही अनेक प्रकरणात राठोड चर्चेत आले होते.
प्रकरण क्रमांक 1: 14 मार्च रोजी 2025 रोजी धाराशिव येथे बीडच्या साक्षी कांबळे या तरुणीने मामाच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या संदर्भात धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या तपासाठी जबाबदारी स्वप्निल राठोड यांच्याकडे होती. मात्र या तपासात गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप मृत मुलीच्या आईने केला होता. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून राठोड यांच्या कडून तपास काढून घेत कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या कडे सोपविला होता.
प्रकरण क्रमांक 2: 14 मे 2024 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिवशी धाराशिव शहरात शिवप्रेमी कार्यकर्त्यांवर उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनी अक्षरश रस्त्यावर संभाजी महाराजांची मूर्ती ठेवली होती. या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली होती. याप्रकरणी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्याकडे या तपासाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र पुढे काही कारवाई झाली नाही.