ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dharashiv ZP Election 2026: राज्याच्या राजकारणात सध्या जिल्हा परिषद, पंचाय समितींच्या निवडणुकांचे सत्र सुरु आहे. आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच धाराशिवमध्ये महायुती जाहीर झाली असली तरी उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेची युती टिकणार की तणाव वाढणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धाराशिवमध्ये महायुतीत कलह...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती जाहीर झाली असली, तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र युतीतच तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. जागावाटपात शिवसेनेला ५५ पैकी २३ जागा देण्यात आल्या असताना, याच जागांवर भाजपने उमेदवार उभे केल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.
Nagpur Election 2026: नागपुरात काँग्रेसची ठाकरे गटासह मुस्लीम लीगला साद; नव्या समीकरणामागे खेळी काय?
जागा वाटपावरुन वाद वाढला..
विशेषतः आमदार तानाजी सावंत यांच्या परांडा विधानसभा मतदारसंघातील १३ जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात उतरल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे भाजपचे हे उमेदवार अर्ज मागे घेऊन महायुतीची एकजूट दाखवणार का? की धाराशिव नगर परिषद निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा युतीत मिठाचा खडा पडणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी “पेपर फोडणार नाही” असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे, तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी चर्चेतून सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी काय निर्णय होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Kalyan News: नवनिर्वाचित नगरसेवकावर बाऊन्सर घेऊन फिरण्याची वेळ, कारण समोर येताच सर्वच जण...