- धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाने भोंदूबाबांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे
- अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील महिलांनी भोंदूबाबांविरुद्ध जागरूकता वाढवून सामाजिक चळवळ सुरु केली आहे
- भोंदूबाबांच्या गैरव्यवहारामुळे महिलांनी ठराव करून त्यांच्या गावात प्रवेशावर बंदी घातली आहे
नागिंद मोरे
अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. बाबागिरीच्या नावाखाली नको ते धंदे केले जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनीच या भोंदूबाबांपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा आहे. पण या कायद्याचा धाक अशा भोंदूबाबांना नाही. त्याचा ते गैरफायदा घेत अनेक सर्वसामान्यांना फसवत आहेत. त्यातूनच नको ते प्रकार झाल्याचे अशोक खरात प्रकरणात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या एका गावाने भोंदूबाबा, बुवाबाजी करणाऱ्या भामट्यांना गाव बंदीचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे राज्यातले हे पहिले गाव ठरले आहे. या निर्णयाचे कौतूक ही होत आहे.
नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी धडक निर्णय घेतला आहे. सगळ्या गावातल्या महिला एकत्र येत एक ठराव केला. या ठरावा नुसारा गावात या पुढे कोणत्या ही भोंदूबाबाला प्रवेश दिला जाणार नाही. फसवणूक करणाऱ्या, लुटणाऱ्या भोंदू बाबांना या पुढे गावात प्रवेश नाकारण्यात आला आहे. महिलांनी यासाठी विशेष ठराव मंजूर करत भोंदू बाबांना गावबंदी केली आहे. बुवाबाजीला आळा घालण्यासाठी घेतलेला हा निर्णय आता इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे.
महिलांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. शिवाय कौतूक ही केलं जात आहे. हा निर्णय घेण्यासाठी विशेष करून महिलांनी पुढाकार घेतला. त्याची ही पंचक्रोशीत चर्चा होत आहे. ही एक सामाजिक चळवळ म्हणून पुढे येवू शकते. निमगुळ गावा प्रमाणेच राज्यातील इतर गावातील महिला ही अशाच पद्धतीने पुढे येतील. त्यांच्याकडून ही अशाच पद्धतीने भोंदूबाबांना गावबंदी केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे झाले तर या भोंदूबाबांचे धाबे दणाणल्या शिवाय राहाणार नाही अशी चर्चा सुरू आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचं शारीरिक शोषण केलं आहे. तर अनेक उद्योजकांना देखील फसवलं आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर येताच धुळे तालुक्यातील निमगुळ येथली गावकऱ्यांनी एकत्र येत मोठी निर्णय घेतला आहे. अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी महिलांना भोंदू आपल्या घरात कधी येऊ नये यासाठी जादूटोणाविरोधी कायद्याची पुस्तकाचे वाटप केले, जर असे प्रकार आढळल्यास जादूटोणाविरोधी कायद्याने महिलांनी धाडस दाखवून गुन्हा नोंदवावा. असं देखील महिलांना सांगण्यात आलं.