- साक्री शहरातील स्थानिक महिलांनी पुरुषांसाठी नव्या स्वच्छतागृहाच्या बांधकामाला कडाडून विरोध केला आहे
- महिलांच्या मते या सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे परिसरात दुर्गंधी, रोगराई आणि सामाजिक सुरक्षेचा प्रश्न आहे
- स्थानिक महिलांचा दावा आहे की परिसरात मद्यपींचा वावर असून ते नशेत स्वच्छतागृहाच्या बाहेर लघुशंका करतात
नागिंद मोरे
स्वच्छता गृह ही एक मुलभूत गरज आहे. मग ते महिलांचे असो किंवा पुरूषांचे असो. स्वच्छता गृह हे असलेच पाहीजे. खास करून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छका गृहाची गरज असते. तशी ती अनेक ठिकाणी असतात. पण धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात महिलांनी पुरूषांच्या स्वच्छता गृहाला कडाडून विरोध केला आहे. ऐवढेच नाही तर त्यासाठी त्यांनी थेट नगर पंचायतीवर मोर्चाही काढला. पुरूषांसाठी स्वच्छता गृह का नको या मागचे कारण ही भयंकर आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे. स्वच्छता गृह नको या साठी महिला आक्रमक झाल्या आहे. त्यांनी आपला आक्रोश ही व्यक्त केला आहे.
साक्री शहरातील पोळा चौक परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या मुद्द्यावरून स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील जीर्ण झालेल्या पुरुष स्वच्छतागृहाच्या नवीन बांधकामाला शेकडो महिलांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. हा विरोध करताना शहरातील महिलांनी नगरपंचायत प्रशासनाला घेराव घातला. पोळा चौक भागातील पुरुषांचे स्वच्छतागृह गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. शिवाय ते पडझड झालेल्या अवस्थेत होते. आता नगरपंचायत प्रशासनाने या ठिकाणी पुन्हा नवीन बांधकाम सुरू केल्याने स्थानिक रहिवासी महिला संतप्त झाल्या आहेत.
महिलांच्या मते, या स्वच्छतागृहामुळे परिसरात केवळ दुर्गंधी आणि रोगराईच पसरत नाही, तर सामाजिक सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याभागात मद्यपींचा वावर असल्याचा महिलांचा दावा आहे. महिलांनी निवेदनात नमूद केले आहे की, या स्वच्छतागृहाच्या परिसरात अनेक पुरुष मद्यप्राशन करून वावरत असतात. शिवाय ते नशेच्या धुंदीत अनेकजण स्वच्छतागृहाच्या बाहेरच लघुशंका करतात. ज्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला आणि मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
अस्वच्छतेमुळे संपूर्ण परिसरात रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असं ही महिलांनी सांगितलं. वारंवार तक्रारी आणि निवेदने देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने, अखेर शेकडो महिलांचा मोर्चा थेट नगरपंचायतीवर धडकला. "या ठिकाणी पुन्हा स्वच्छतागृह बांधू नका," अशी मागणी महिलांनी लावून धरली आहे. जोपर्यंत प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही, तोपर्यंत महिला आपला लढा सुरू ठेवणार असल्याचे चित्र दिसत आहे. महिलांच्या या विरोधामुळे नगरपंचायत प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.