- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने आहे ट्रकसाठी वाहतुकीस बंदी आहे
- सुरुवातीच्या काळात फक्त कार आणि बस या हलक्या वाहनांना या महामार्गावर विनाअडथळा प्रवासाची परवानगी
- १३.३ किलोमीटर लांब या प्रकल्पासाठी सरकारने सुमारे ७५०० कोटी रुपये खर्च केले आहेत
महाराष्ट्रात अनेक महामार्ग आहेत. या महामार्गावर सर्व प्रकारच्या गाड्यांना प्रवेश असतो. तर काही महामार्गांवर टू व्हीलर सोडून सर्वांना प्रवेश असतो. मात्र राज्यातला असा एक महामार्ग आहे ज्यावर आता ट्रकसाठी बंदी असणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हो आता हा महामार्ग राज्यातला पहिला महामार्ग ठरणार आहे ज्यावर ट्रकला वाहतुकीसाठी बंदी असेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बहुचर्चित 'मिसिंग लिंक' प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने असून, या मार्गावर सुरुवातीच्या काळात अवजड वाहनांना (ट्रक) प्रवेशबंदी असणार आहे. त्यामुळे कार आणि बस चालकांना विनाअडथळा आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अनेकदा ट्रक चालक लेनचे नियम पाळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढते असे समोर आले आहे. हे टाळण्यासाठी 'मिसिंग लिंक'च्या पहिल्या टप्प्यात फक्त कार आणि बसनाच प्रवेश देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचे अधिकृत परिपत्रक लवकरच वाहतूक विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. 13.3 किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी सरकारने सुमारे 7500 कोटी रुपये खर्च केले आहेत. या मुळे मुंबई पुणे हा प्रवास आणखी जलद होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र दिनाचे (1 मे) औचित्य साधून हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहे. तयारी ही त्या पद्धतीने सरकारने केली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या मार्गाची अंतिम चाचपणी आणि पाहणी केली जात आहे. पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाने नुकताच या ठिकाणच्या वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला आहे. त्यामुळे हा महामार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची दाट शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'मिसिंग लिंक' सुरू झाल्यानंतर पहिले 6 महिने फक्त हलकी वाहने आणि बस या मार्गावरून धावतील. पावसाळ्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन मालवाहू वाहनांना प्रवेश देण्याबाबत विचार केला जाईल. सध्या एक्स्प्रेस वेवरील एकूण वाहतुकीत कार आणि बसचे प्रमाण 70 टक्के आहे. या निर्णयामुळे बोरघाटातील वाहतुकीचा ताण 70 टक्क्यांनी कमी होऊन प्रवासाचा वेळही वाचणार आहे. शिवाय बोरघाटातील ट्रॅफिक जॅममधून सुटका होणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे. पोलीस प्रशासनानेही या निर्णयाला दुजोरा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world