आषाढी एकादशीच्या निमित्ताने इतिहासात पहिल्यांदाच नेवासा येथुन पंढरपूरकडे दिंडी प्रस्थान करत आहे. आज सकाळी अहिल्यानगर तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल झाली. या वेळी 40 दिंड्या आणि जवळपास 20 हजार वारकरी सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होत भक्तिमय वातावरणात सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात ही पालखी नेवासानगरीत दाखल झाली. यावेळी पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी "ज्ञानेश्वरी" हे अद्वितीय ग्रंथराज लिहिला आणि वाचला, त्या नेवासा भूमीतून ही पालखी प्रथमच पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. आळंदीनंतरचे महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून नेवासा ओळखले जाते. त्यामुळे या वारीत अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्यावेळी पालखी शहराद दाखल झाली त्यावेळी दोन किलोमीटरहून अधिक लांब दिंडीची रांग होती. यावेळी टाळ, मृदंग, विणा आणि भक्तिरसात अभंगांनी वातावरण भारून गेले होते. वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार राहीला नव्हता.
ही वारी केवळ एक धार्मिक परंपरा नसून,ती भक्ती, समर्पण आणि संस्कृतीचा संगम आहे. अशा प्रकारे प्रथमच नेवासातून निघालेली ही पालखी पंढरपूरकडे पावन यात्रेसाठी मार्गस्थ झाली. संपूर्ण मार्गावर भक्तजनांची अपार श्रद्धा आणि प्रेम अनुभवायला मिळालं. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सन 1290 साली ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीत एकूण 18 अध्याय आहेत. त्यांनी मंदिरातील खांबाला टेकुन ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. या खांबाला पैसे खांब म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेतील पहिला मराठी ग्रंथ आहे. ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांच्या आदेशावरून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. त्याला ‘ज्ञानेश्वरी' किंवा ‘भावार्थदीपिका' असे म्हणतात.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दोन दिवस मुक्कामी असल्यानंतर 22 तारखेला पुण्याहून सासवडच्या दिशेला प्रस्थान ठेवले. 24 तारखेला पुन्हा सासवड होऊन जेजुरीच्या दिशेने पालखीचा प्रवास असेल. 25 तारखेला पालखी वाल्हे येथे पोहोचेल त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना निरास्नान होईल. 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण होईल. 1 जुलै नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडेल. 2 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल, तीन जुलै वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण होईल, 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावाची विहीर याठिकाणी होईल त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी पोहोचेल. 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल होईल .