औरंगजेबावरून राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही महिन्या पूर्वी औरगंजेबाची समाधी उखडून फेकावी यासाठी आंदोलन झालं होतं. राज्यभरात त्यासाठी आंदोलनही केलं गेलं होतं. त्यामुळे तणावही निर्माण झाला होता. नागपूरात तर या पार्श्वभूमीवर दंगलही उसळली होती. मात्र त्यानंतर सर्व परिस्थिती नियंत्रणात आली. हा मुद्दाही मागे पडला होता. पण आता मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाचं कौतूक करत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आसिफ शेख हे मालेगावचे माजी आमदार आहे. त्यांनी औरंगजेबाबाबत एक वक्तव्य केलं आहे. औरंगजेब हा एक अतिशय पवित्र व्यक्ती होता असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय तो टोपी शिवून दोन वेळचे जेवण मिळवायचा. त्यामागे त्याची मेहनत होती. टोप्या विणून त्या तो विकत. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर तो स्वत:चा उदरनिर्वाह करत होता. शेख ऐवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी औरंगजेबाची आणखी ही स्तुती केली आहे.
औरंगजेब याने सर्वधर्म समभाव ठेवला होता. त्याने नेहमीच सर्व धर्माचा सन्मान केला असं वक्तव्य ही त्यांनी केले आहे. पण सध्या केवळ राजकारणासाठी औरंगजेबाच्या नावाचा वापर केला जात आहे. औरंगजेबाला बदनाम केलं जात आहे असं ही ते म्हणाले. औरंगजेबाच्या नावाचा वापर करून मत मिळवण्याचा डाव काहींनी रचला आहे. महाराष्ट्रात सध्या तेच सुरू आहे असा आरोप ही त्यांनी या निमित्ताने केला आहे. त्यांच्या यावक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राज्यात औरंगजेबाबाबत चिड निर्माण झाली. हिंदूत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. औरंगजेबाची कबरही महाराष्ट्रात आहे. ही कबर उखडून फेकावी अशी मागणी करण्यात आली. काही संघटनांनी तर आपण ती कबर उखडून फेकणार असल्याचं सांगितलं होतं. यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं होतं. पण औरंगजेबाची कबर ही संरक्षित असल्याने सरकारलाच त्या कबरीला संरक्षण द्यावं लागलं होतं.