Ro Ro Ferry : श्रावण महिना अर्धा उलटला आहे. आता सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. कोकणात गणेशोत्सवाचा जल्लोष जबरदस्त असतो. मुंबईत राहणारे कोकणातील मंडळी जीवाचा आटापिटा करुन गणपतीला गाव गाठतात.
मुंबई-गोवा महामार्गाची खराब अवस्था, रेल्वेचे काही क्षणात फुल्ल होणारे रिझर्व्हेशन यामुळे गणेशभक्तांना गावी जाण्यासाठी अनेक अडथळे सहन करावे लागतात. पण, यंदाच्या गणेशोत्सवात सर्व कोकणवासियांना एक दिलासादायक गोष्ट घडणार आहे.
गणपतीपूर्वी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी बोट सुरु करण्याच्या जोरदार हलचाली सुरु आहेत. मुंबईहून रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन ठिकाणी बोट सेवा सुरु होणार आहे. मुंबई ते मांडवा अशी रो रो सेवा सध्या सुरु आहे. याप्रमाणेच मुंबईतून मोठी बोट समुद्रातून प्रवासी वाहतकुकीसाठी सुरु करण्याच्या हलचाली सुरु आहेत.
( नक्की वाचा : Ganpati Festival: गणेशोत्सवासाठी BMC सज्ज: ऑनलाइन परवानगी, पर्यावरणपूरक उत्सवावर भर आणि कठोर नियम लागू )
या बोटीनं रत्नागिरी 3 तासांमध्ये तर सिंधुदुर्ग 5 तासांंमध्ये गाठता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत मोठ्या प्रमाणात होईल. . देवगड, मालवण, राजापुरला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही बोट फायदेशीर ठरणार आहे. मुंबईहून रेल्वेनं या गावाला जाणाऱ्या लागणाऱ्या वेळेपेक्षा हा वेळ निम्म्याहून कमी असेल. या बोटीतून एकाचवेळी 150 चारचाकी वाहनं आणि 500 प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग येथे बोटीचा थांबा असेल अशी माहिती आहे.
या बोटीचे भाडे किती असेल याची अद्याप खात्रीदायक माहिती समोर आलेली नाही. पण, विमानसेवेच्या इतकेच प्रवास भाडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. गणपतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बोट सेवेचे शुभारंभ करण्याच्या हलचाली सुरु आहेत.