राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात ट्विट केलं आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात उशीर झाल्याचंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमान चाळीशीपार पोहोचलं. मुंबई शहर, उपनगरांमध्ये नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळ्यांचा सामना करावा लागला. 

सोमवारी हवामान विभागाकडून ठाणे, मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याचा अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाकडून या तिन्ही जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. आजही या तीनही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 

Advertisement

आज पालघरमध्ये 16 वर्षांच्या विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर टोपी, गमछा घेऊनच घराबाहेर पडावं. दुपारी कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडताना अधिक काळजी घ्यावी. याशिवाय आहारातील पाण्याचं प्रमाण वाढवावं असं आवाहन केलं जात आहे. 

राज ठाकरेंचं आवाहन...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात ट्विट केलं आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात उशीर झाल्याचंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी.