समाधान कांबळे, हिंगोली
Hingoli Earthquake: हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेले भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज सकाळी जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि आसपासच्या परिसराला भूकंपाचा आणखी एक सौम्य धक्का बसला. या धक्क्यामुळे नागरिक घराबाहेर पडले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लोहरा गाव भूकंपाचे मुख्य केंद्र
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजून 14 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवला. भूमापक केंद्रात या भूकंपाची तीव्रता 3.5 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील लोहरा गाव हे या भूकंपाचे मुख्य केंद्र होते. लोहरा गावासोबतच शेजारील पिंपळदरी या गावालाही हा धक्का प्रकर्षाने जाणवला.
(नक्की वाचा- Kalyan News: खाऊ आणायला गेलेली आई परतलीच नाही, शॉक लागून महिलेचा मृत्यू; पोलिसाची संतापजनक कृती)
कळमनुरी, औंढा आणि वसमत तालुक्यात वारंवार धक्के
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा आणि वसमत या तीन तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीसुद्धा या भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा जमिनीतून गूढ आवाज येत धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार होणाऱ्या या भूगर्भिय हालचालींमुळे नागरिक सतर्क झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world