Nashik Saved From Cloudburst: राज्यात मान्सूनच्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून ठिकठिकाणी दरडी कोसळणे, महामार्ग पाण्याखाली जाणे आणि नवनिर्मित मुंबई-पुणे मिसिंग लिंक बंद पडल्यामुळे दोन्ही शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सगळ्या गंभीर परिस्थितीशी झुंजत असतानाच, राज्य सरकारसमोर नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाचे आणखी एक मोठे संकट घोंघावत होते. मात्र, यावेळी प्रशासन गाफील राहिले नाही. भारताची अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली 'भारत फोरकास्ट सिस्टम' (BharatFS) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने प्रशासनाला तब्बल 24 तास आधीच या संकटाची अचूक माहिती मिळाली होती. हा अतिरिक्त वेळ मिळाल्यामुळे यंत्रणेने पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच सर्व आपत्ती व्यवस्थापन प्रोटोकॉल सक्रिय केले आणि म्हणूनच वेळेत नाशिक वाचलं!
नक्की काय आहे ही 'भारत फोरकास्ट सिस्टम' (BharatFS)?
भारत फोरकास्ट सिस्टम ही देशातील सर्वात प्रगत आणि पूर्णपणे स्वदेशी हवामान अंदाज प्रणाली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत पुणे येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी' (IITM) ने ही यंत्रणा विकसित केली आहे. जुन्या हवामान मॉडेल्समध्ये साधारणपणे 12 किलोमीटरच्या परिघातील अंदाज मिळायचे, ज्यामुळे ढगफुटीसारख्या अत्यंत स्थानिक पातळीवरील घटनांचा अचूक अंदाज लावणे शक्य होते.
मात्र, 'BharatFS' अवघ्या 6 किलोमीटरच्या परिघातील अतिशय अचूक आणि स्थानिक अंदाज वर्तवते. ही प्रणाली पुणे येथील 'अर्क' आणि नोएडा येथील 'अरुणिका' या भारताच्या महासंगणकांद्वारे (Supercomputers) संचलित केली जाते, ज्यामुळे हवामान बदल अत्यंत वेगाने आणि दर 3 तासांनी मिळतात. यात प्रगत अचूकतेसाठी एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक मोहीम हायकोर्टात फेल, ऐतिहासिक गोरस भांडाराचा FDA विरुद्ध मोठा विजय )
एआय तंत्रज्ञानाने नाशिकला कसे वाचवले?
मुंबई, पुणे आणि रायगडमध्ये पावसाचे संकट आधीच गंभीर असताना, या प्रणालीने नाशिक जिल्ह्यात अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे एक दिवस आधीच अचूक ओळखले होते. हा इशारा मिळताच संपूर्ण यंत्रणा हायमोडवर आली आणि त्यामुळेच नाशिक वाचलं.
पूर्वसूचनेमुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन सक्रिय करण्यात आले आणि नाशिक जिल्हा प्रशासनाला तात्काळ सतर्कतेचा इशारा देण्यात आला. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथके आधीच संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आली. नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीवर बारीक लक्ष ठेवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी पूर्ण झाली. तसेच धोकादायक ठिकाणी जाण्यास पर्यटकांना आणि नागरिकांना वेळेत मज्जाव करण्यात आला.
महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
मे 2026 महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) पुणे आयआयटीएमसोबत करार केला. असा करार करून हवामान अंदाज प्रणाली थेट आपल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या प्रणालीचे अंदाज राज्याच्या आपत्ती नियंत्रण कक्षाशी आणि जिओ-स्पेशिअल डिसिजन सपोर्ट सिस्टमशी जोडलेले आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांपासून ते थेट बचाव पथके आणि प्रशासनापर्यंत सर्वांना पाऊस, वाऱ्याचा वेग, तापमान आणि ढगांची स्थिती याविषयीची अत्यंत अचूक माहिती रिअल टाइममध्ये मिळते.
आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याची मोठी भूमिका
या हवामान इशाऱ्याचे गांभीर्य ओळखून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः नाशिकमध्ये रात्रभर मुक्काम ठोकला आणि परिस्थितीवर थेट देखरेख ठेवली. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून सर्व यंत्रणांना सज्ज ठेवले.
या इशाऱ्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली, प्रमुख मंदिरांमधील दर्शन तात्पुरते बंद ठेवण्यात आले, साप्ताहिक बाजार रद्द केले गेले आणि पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या वाटांवर बॅरिकेड्स लावण्यात आले. मंत्र्यांच्या या थेट उपस्थितीमुळे आणि अचूक नियोजनामुळे नाशिक वाचलं आणि पुढील मोठा अनर्थ टळला.