- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला
- भाई सथ्था नाईट स्कूलच्या सख्ख्या बहिणी प्रीती, स्वाती आणि अनिशा अल्हाट यांनी एकाच वेळी बारावी उत्तीर्ण केली
- या बहिणी दिवसभर कष्ट करून रात्री शाळेत येऊन अभ्यास करत संघर्षातून यश संपादन केले आहे
प्रसाद शिंदे
Ahilyanagar 12th Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात अनेक यशोगाथा समोर आल्या आहेत. मात्र, अहिल्यानगरमधील भाई सथ्था नाईट स्कूलच्या तीन सख्ख्या बहिणींच्या यशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रीती राजू अल्हाट, स्वाती राजू अल्हाट आणि अनिशा राजू अल्हाट असं या बहिणींचं नाव आहे. या तिघींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकाच वेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशाचं संपूर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे. या तीघींनी ही संघर्ष करत यशाला गवसणी घातली आहे.
दिवसभर कष्ट, रात्री अभ्यास
भाई सथ्था नाईट स्कूल हे प्रामुख्याने कष्टकरी आणि दिवसभर नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे. या शाळेतील प्रीती अल्हाट दिवसभर एका मेसमध्ये काम करून संध्याकाळी शाळेत जात होत्या. त्यांची बहीण अनिशा अल्हाट गावाकडे शेतीकामात हातभार लावून वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत असे, तर स्वाती अल्हाट हिने घरची सर्व जबाबदारी सांभाळून परीक्षेची तयारी केली. असा स्थितीत या तीन ही बहिणी शिकल्या. येवढच नाही तर त्यांनी आपलं स्वप्न ही साकार केलं.
बहिणीच्या हट्टामुळे मिळाले यश
या तिन्ही बहिणींच्या यशात प्रीती अल्हाट यांचा मोठा वाटा आहे. आपल्या दोन्ही धाकट्या बहिणींनी शिक्षण अर्धवट सोडू नये आणि त्यांनी किमान बारावीपर्यंत तरी शिकावे, यासाठी प्रीती यांनी हट्ट धरला होता. त्यांच्या याच जिद्दीमुळे आज तिघींनीही यशाची शिखरं सर केली आहेत. प्रीती यांनी नुसता हट्ट धरला नाही तर त्यांनी ही बारावीची परिक्षा दिली. त्या ही या परिक्षेत उत्तीर्ण झाल्या. आपल्याला मिळालेल्या यशा बद्दल या तिघींनी ही आनंद व्यक्त केला आहे. शिवाय आणखी पुढे शिकण्याची इच्छा ही त्यांनी व्यक्त केली आहे.
पुढील शिक्षणाची जबाबदारी शाळेची
या तिघींच्या यशाचे कौतुक हिंद सेवा मंडळाचे माजी चेअरमन पारस कोठारी यांनी केले आहे. या भगिनींच्या संघर्षाची दखल घेऊन भाई सथ्था नाईट स्कूल त्यांच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलणार असल्याचे कोठारी यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे, या शाळेतून केवळ या तिघीच नव्हे, तर पती-पत्नी, सख्ख्या जावा आणि चुलत बहिणींनीही बारावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.