- पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या बालिकेवर 65 वर्षीय आरोपीने अत्याचार करून निर्घृण हत्या केली
- घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन केले
- पीडित बालिकेच्या मृतदेहावर प्रशासनाच्या आश्वासनानंतर 28 तासांनी अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या एका अमानवीय घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्याचे पडसाद ही सर्वत्र उमटले. अवघ्या 4 वर्षांच्या निष्पाप बालिकेवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार केले. त्यानंतर त्याने तिची निर्घृण हत्या ही केली. या घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते. चिमुरडीच्या कुटुंबीयांसोबतच संतप्त नागरिकांनी याचा निषेध केला. पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन ही करण्यात आलं होतं. चिमुरडीचा मृतदेह ही तसाच ठेवण्यात आला होता. शेवटी प्रशासनानं दिलेल्या आश्वासनानंतर तब्बल 28 तासांनी या चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव भावूक झालं होतं. कुटुंबीयांनी तर आश्रूंना वाट करून दिली होती. अशा वातावरणात तिला शेवटच्या निरोप देण्यात आला.
आरोपीला फाशीची शिक्षा द्या. तातडीने हे प्रकरण मार्गी लावा असा आग्रह पिडीत चिमुकलीच्या कुटुंबीयांचा आणि गावकऱ्यांचा होता. त्यासाठी सर्वच जण आक्रमक झाले होते. त्यांनी मुंबई बंगळुरू हायवे ही जाम केला होता. या सर्व संतप्त प्रतिक्रीयेनंतर तब्बल 28 तासांनी नसरापूर लैंगिक अत्याचारातील पिडीतेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत वैकुंठ स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आले होते. रात्री जवळपास 11.50 मिनिटांनी मुलीच्या चितेला वडिलांनी मुखाग्नी दिला. यावेळी सर्वच जण ढसाढसा रडत होते. स्मशानभूमीतलं वातावरण भावूक झालं होतं.
हा घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे.या पार्श्वभूमीवर आता स्थानिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. म्हणूनच भोर आणि राजगड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. बंद कडकडीत करावा असं आवाहन सर्वांनी केला आहे. चिमुकलीच्या न्यायासाठी एकत्र येण्याचा निर्धार स्थानिकांनी केला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी ग्रामस्थ आणि पीडितेच्या नातेवाईकांनी आता थेट भूमीका घेतली आहे. दरम्यान बाल हक्क आयोगाच्या भूमिकेबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून प्रशासनाचा निषेध ही शनिवारी रात्री करण्यात आला.
पीडित मुलगी सुट्ट्यानिमित्त नसरापूर येथे आजीकडे आली होती. खेळत असताना आरोपीने तिला फूस लावून गोठ्यात नेले. त्यानंतर तिथेच तिच्यावर अत्याचार केले. पुढे तर त्याने आणखी भयानक कृत्य केले. त्यामुलीचा त्याने खून केला. ओळखीचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला होता. या घटनेने ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world