IAS Ashwini Bhide : मुंबई महापालिकेला मिळाल्या नव्या कारभारी; अश्विनी भिडे यांच्या खांद्यावर मुंबईची धुरा!

देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची धुरा आता एका महिला अधिकाऱ्याच्या हाती आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ashwini Bhide as BMC Commissioner : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची निवड झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची धुरा आता एका महिला अधिकाऱ्याच्या हाती आली आहे. प्रशासकीय अनुभवाचा प्रदीर्घ वारसा आणि शिस्तबद्ध कामकाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकारचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ 31 मार्च रोजी संपत असल्याने त्यांच्या जागी आता भिडे मुंबईचा कारभार सांभाळतील.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. या पदासाठी असिम गुप्ता यांच्या नावाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आग्रही मागणी केली जात होती. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अश्विनी भिडे यांच्या नावासाठी आग्रही होते. या दोन वरिष्ठ नेत्यांमधील चर्चेनंतर अखेर सोमवारी झालेल्या बैठकीत अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

Advertisement

नक्की वाचा - IPS Tejaswi :चौथीतील 'ती' घटना टर्निंग पॉईंट ठरली, बेशिस्त विद्यार्थिनी अशी बनली IPS; आता 'खरात'चा छडा लावणार!

मेट्रो प्रकल्पातील यशस्वी कारकीर्द आणि अनुभव

अश्विनी भिडे यांनी यापूर्वी मुंबईतील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा भूमिगत मेट्रो प्रकल्पाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. मोठ्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे प्रशासनात त्यांचा दबदबा आहे. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) सचिव म्हणूनही काम पाहिले असून देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी त्या एक मानल्या जातात. मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी यापूर्वी काम केल्याने त्यांना नगर प्रशासनातील बारकाव्यांची चांगली जाण आहे.

प्रशासकीय आव्हाने आणि मुंबईचा विकास

नव्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताना अश्विनी भिडे यांच्यासमोर मुंबईतील पावसाळ्यापूर्वीची कामे, रस्ते काँक्रिटीकरण आणि विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मुंबईच्या नागरी समस्या सोडवतानाच प्रशासकीय पारदर्शकता आणण्यावर त्यांचा भर राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या इतिहासात महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या त्या प्रभावशाली महिला अधिकारी ठरल्या आहेत