Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दौरा करून सप्टेंबरनंतर विमानतळ सुरू होईल, अशी घोषणा केली. मात्र, या भव्य प्रकल्पाला एक गंभीर अडथळा निर्माण झाला आहे — उलवे परिसरातील मटण आणि चिकन दुकानांमुळे विमानाच्या उड्डाणावेळी पक्षी धडकेचा धोका निर्माण झाला असून, पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक संस्था यावर आक्रमक भूमिका घेत आहेत. विशेषतः, मांस खुले फेकल्यामुळे गिधाडे, कावळे आणि इतर पक्ष्यांची वर्दळ वाढत असून, हे पक्षी थेट विमान मार्गावर येण्याचा धोका निर्माण करत आहेत.
Navi Mumbai Airport : कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती
डीजीसीएकडे तक्रार, आता मुख्यमंत्र्यांना पत्र
नॅट कनेक्ट फाउंडेशन या पर्यावरण संस्थेने या गंभीर प्रकाराबाबत थेट नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) कडे तक्रार दाखल केली आहे. संस्थेचे संचालक बी. एन. कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की, "विमानतळाच्या १० किमी परिसरात कत्तलखाने, खुले मटण दुकानं आणि मांस विक्री केंद्रांना परवानगी नाही. मात्र उलवे येथे ही दुकाने बिनधास्त सुरू आहेत. यामुळे पक्षी विमानाच्या उड्डाण मार्गात येण्याचा धोका वाढतो आहे."
ते पुढे म्हणाले, “डीजीसीएकडे तक्रार दिल्यानंतरही अद्याप ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती करणार आहोत. केवळ बांधकाम नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीने देखील गंभीर पावले उचलली पाहिजेत. "स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी यांनी अनेकदा संबंधित प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, उलवे परिसरात मटण आणि चिकन दुकाने आजही निर्बंधांशिवाय चालू आहेत.
काय आहे नियम?
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरात पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी, जसे की उघड्यावर कचरा, मांस, कत्तलखाने, मांसप्रक्रिया केंद्र यांना परवानगी नाही. परंतु नवी मुंबई विमानतळाच्या अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर ही दुकाने कार्यरत असल्याने नियमांचा सर्रास भंग होत आहे.
Navi Mumbai Airport: सार्वजनिक उपक्रम समितीचा नवी मुंबई विमानतळ पाहणी दौरा, काय आहे अपडेट?
सिडको आणि स्थानिक यंत्रणा आणि प्रशासन गप्प?
या गंभीर समस्येकडे स्थानिक प्रशासन आणि महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांकडून होत आहे. "विमानतळ हा महाराष्ट्रासाठी प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे. यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. मात्र, सुरक्षेच्या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो," असे बी. एन. कुमार यांनी नमूद केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयनाच्या अंतिम टप्प्यात असताना, सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेल्या नियमांचे पालन होणे अत्यावश्यक आहे. उलवे परिसरातील बेकायदेशीर मांस दुकाने आणि त्यातून होणारा पक्ष्यांचा त्रास ही केवळ पर्यावरणीय समस्या नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा विमानतळ सुरू होण्यापूर्वीच मोठा धोका निर्माण होऊ शकतो.