Indurikar Maharaj Daughter Wedding: कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला साधेपणाचे धडे देणारे आणि लग्नातील अवाजवी खर्चावर कडाडून टीका करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. निमित्त आहे त्यांच्या कन्येचा विवाह सोहळा. दुसऱ्याला उपदेश देणाऱ्या महाराजांच्या स्वतःच्या कन्येचा विवाह मात्र अत्यंत शाही थाटात होणार असल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. उद्या म्हणजेच रविवार 3 मे 2026 रोजी हे लग्न होत आहे.
100 एकरवर शाही मांडव आणि भव्य तयारी
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नाचे भव्यत्व इतके मोठे आहे की, तब्बल 100 एकर परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाहुण्यांची सोय व्हावी यासाठी भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या शाही सोहळ्याचीच चर्चा रंगली आहे. ज्ञानेश्वरी देशमुख यांचा हा विवाह सोहळा रविवारी गोरज मुहूर्तावर संपन्न होईल.
( नक्की वाचा : IPL मधील मुस्लीम खेळाडूकडून हिंदू प्रेयसीचे 'ब्रेनवॉशिंग'? कुराणातील आयती पाठ करण्याचा दबाब! वाचा सविस्तर )
राजकीय नेत्यांची मांदियाळी
या सोहळ्यासाठी केवळ वारकरी संप्रदायातील दिग्गजच नव्हे, तर राजकारणातील बडी मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजी-माजी मंत्री, आमदार आणि खासदार यांना या विवाहाचे निमंत्रण देण्यात आले असून अनेक मोठे नेते प्रत्यक्ष हजेरी लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासोबतच विवाहस्थळी सायंकाळी स्वामी गगनगिरी महाराज यांच्या 8 व्या सप्ताहाचे ध्वजारोहणही करण्यात येणार आहे.
साखरपुड्यावर का झाली टीका?
इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा गेल्या वर्षी पार पडला होता. तो सोहळाही अत्यंत थाटामाटात झाला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'लग्न साधे करा' असे सांगणारे महाराज स्वतः मात्र शाही सोहळे करत असल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले होते. या टीकेमुळे महाराज काही काळ व्यथित झाले होते आणि त्यांनी कीर्तन सोडण्याचे संकेतही दिले होते.
( नक्की वाचा : Sanjay Raut: ठाकरेंचा राऊतांना 'चेक मेट'! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला? )
टीकाकारांना उघड आव्हान
साखरपुड्याच्या वेळी झालेल्या टीकेनंतर इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून आपल्या विरोधकांना ठामपणे उत्तर दिले होते. वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणाऱ्यांना सुनावताना ते म्हणाले होते की, "लग्न आणखी जोरात करणार, काय बोंबलायचंय ते बोंबला." त्यांच्या याच विधानानुसार आता हा विवाह सोहळा अत्यंत शाही पद्धतीने पार पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे, महाराजांचे समर्थक मात्र हा सोहळा केवळ वैयक्तिक नसून वारकरी संप्रदायाचा मोठा मेळावा असल्याचे सांगत आहेत. आता हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.