मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon Mahapalika Election: जळगाव महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरात तळ ठोकल्याने आणि महायुतीचे काही उमेदवार बिनविरोध झाल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, सकाळपासूनच नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विकासकामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केल्याचा दावा करत महायुतीने आतापर्यंत 4 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
बिनविरोध विजयी झालेले उमेदवार
- डॉ. गौरव सोनवणे (आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव - शिंदे गट)
- मनोज चौधरी (शिवसेना शिंदे गट)
- प्रतिभा देशमुख (शिवसेना शिंदे गट)
- भाजपचा 1 उमेदवार (नाव अद्याप गुलदस्त्यात)
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिवसभर जळगाव शहरात उपस्थित राहून रणनीती आखल्याने महायुतीला हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे गटाचे गंभीर आरोप
एकीकडे महायुती जल्लोष करत असताना, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाचे 3 उमेदवार सध्या बेपत्ता असून त्यांचे फोन बंद लागत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेबाबत सावंत यांनी चिंता व्यक्त केली आहे. महायुतीचे उमेदवार बिनविरोध करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून आणि धमकावून ठाकरे गटाच्या उमेदवारांवर माघारीसाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
(नक्की वाचा- TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)
लोकशाहीसाठी धोकादायक?
निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे उमेदवार गायब होणे आणि त्यांच्यावर दबाव टाकल्याचे आरोप होणे, हे लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आज सायंकाळपर्यंत आणखी किती उमेदवार माघार घेतात आणि किती जागा बिनविरोध होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.