नाशिक: काश्मीरमधील पहालगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झालेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून गेलेले पर्यटक काश्मीरमध्ये अडकले असून त्यांची परत येण्याची व्यवस्था केली जात आहे. या हल्ल्यावेळीच नाशिकमधील 18 जण सुदैवाने बचावले. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या मखमलाबाद परिसरात राहणारे फडोळ, दराडे आणि मानकर कुटुंबातील 18 जण जम्मू कश्मीरला पर्यटनासाठी गेले होते, यात महिलांसह अगदी तिन वर्षांच्या मुलांपासून ते 7 वर्षांपर्यंतच्या 8 लहान मुलांचाही समावेश होता. 18 तारखेला नाशिकहून रेल्वेने ते निघाले होते.
ज्या दिवशी पहलगामची घटना घडली त्याच दिवशी हे सर्वजण पहलगामला पोहोचणार होते मात्र आदल्या दिवशी रस्त्यात एका ठिकाणी दरड कोसळल्याने त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, रात्र त्यांनी गाडीत काढल्याने दुसऱ्या दिवशी एका हॉटेलवर त्यांनी आराम करत पहलगामला न जाता गुलमर्गला जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, गुलमर्गला पोहोचताच पहलगामचा आतंकवादी हल्ला त्यांच्या कानी पडला. ही घटना समजतात पुढचे सर्व प्लॅन रद्द करत ते श्रीनगरला पोहोचले, नाशिकला परतायचं कसे? असा त्यांच्यासमोर प्रश्न असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि एका विशेष विमानाने ते मुंबईला परतले.