
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप आहे. भारत सरकारने यावर अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. यात सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, अटारी-वाघा सीमा बंद करणे या सारखे निर्णय घेतले आहे. भारताने पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध मर्यादित केले आहेत. यासोबतच, भारत पाकिस्तानविरुद्ध लष्करी पर्याय निवडण्याची शक्यता वाढत आहे. भारताने आपल्या सैन्याला सतर्क आणि तयार राहण्यास सांगितले आहे. अशा स्थितीत युद्ध झालं तर भारताच्या बाजून कोण असेल याचा एक आढावा येवूयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य केले. तेव्हा जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. यात अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इजरायल, जर्मनी, इराण आणि सौदी अरब यांसारख्या अनेक देशांचा समावेश होता. मुस्लिम वर्ल्ड लीगसारख्या संघटनांनी ही या हल्ल्याचा निषेध केला. या सर्व देशांनी भारतासोबत एकजूट दर्शवली आहे. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स भारताच्या अधिकृत दौऱ्यावर होते. हल्ल्यानंतर व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. आपण भारतासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी आपला दौरा रद्द न करता तो सुरू ठेवण्याचा निर्णय ही घेतला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'काश्मीरमधून खूप धक्कादायक बातमी आली आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभा आहे.' यावरून अमेरिकेने दाखवून दिले की ते भारतासोबत किती मजबूतपणे उभे आहेत. पहलगाम हल्ल्यानंतरही आपला भारत दौरा सुरू ठेवून अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना एक कठोर संदेश दिला होता. भारताचा आणखी एक विश्वासू मित्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संदेश पाठवला. त्यांनी सांगितले की ते भारतासोबत आहेत.
तर, इस्रायलच्या पंतप्रधानांनीही भारतासोबत एकजूट दर्शवली. भारताच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यात इस्रायलचा मोठा वाटा आहे. तो भारताला अनेक प्रकारची शस्त्र पुरवतो. तो दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला खंबीरपणे पाठिंबा ही देतो. पहलगाम हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन जागतिक व्यवस्था आकार घेत आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जगातील बहुतेक देश भारतासोबत उभे दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायात आजकाल पाकिस्तानचा सर्वात मोठा हितचिंतक चीन आहे. तो नेहमीच त्याच्यासोबत उभा असलेला दिसतो. पण पहलगाम हल्ल्यानंतर चीनने जी प्रतिक्रिया दिली, ती बरीच उत्साहवर्धक होती. नवी दिल्लीतील चीनी दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे आम्ही स्तब्ध आहे, आणि त्याचा निषेध करतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आम्ही विरोध करतो.' चीनच्या या प्रतिक्रियेमागे ट्रम्प यांच्या व्यापार युद्धाचा परिणाम दिसून येतो.
या व्यापार युद्धामुळे त्रस्त झालेले भारत आणि चीन आर्थिक सहकार्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. येथे हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे की सीमेवर तणाव आणि 2020 मध्ये गलवानसारखी घटना घडल्यानंतरही भारत-चीनने व्यापार थांबवला नाही. चीनचे हित पाकिस्तानपेक्षा भारतासोबत अधिक आहे, कारण भारत जेवढी मोठी बाजारपेठ आहे, तेवढी पाकिस्तानमध्ये नाही. अशा स्थितीत युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास चीन कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टीचा नक्कीच विचार करेल. असे त्याने भूतकाळातही दाखवले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धांमध्ये चीनने स्वतःला दूर ठेवले होते.
गेल्या काही दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची स्थिती खूप मजबूत झाली आहे. भारताच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते. जगातील प्रत्येक लहान-मोठ्या प्रतिष्ठित गटाचे सदस्यत्व भारताकडे आहे. तर, पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आज त्याला एका अयशस्वी देशाच्या श्रेणीत ठेवले जात आहे. त्याची आर्थिक स्थितीही बिकट होत चालली आहे. तो सतत आंतरराष्ट्रीय पाठिंबा गमावत चालला आहे. तो गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. पण अमेरिका त्याला महत्त्व देत नाही. ओसामा बिन लादेन एबटाबादमध्ये मारला गेल्यापासून दहशतवादाशी त्याचे संबंध अधिक उघड झाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची स्थिती कमजोर झाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अरब देशांशी चांगले संबध प्रस्थापित केले आहेत. सौदी अरब, यूएई, इराण आणि कतार यांसारख्या देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. ज्या दिवशी पहलगाम हल्ला झाला, त्या दिवशी पंतप्रधान सौदी अरबमध्येच होते. त्यांना हल्ल्याची माहिती तेथेच मिळाली. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सौदी अरबचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी भारताला मदतीचे आश्वासनही दिले होते. पहलगाम हल्ल्याचा निषेध करणाऱ्यांमध्ये मुस्लिम वर्ल्ड लीगचाही समावेश आहे. पहलगाम हल्ल्यावरील अरब आणि मुस्लिम जगातून आलेल्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होते की तेथूनही पाकिस्तानला निराशाच पदरी पडेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world