यशपाल सोनकांबळे, पुणे:
SSC&HSC Paperless Examination System: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आता हायटेक होणार आहे. दरवर्षी परीक्षेसाठी लागणाऱ्या हजारो टन कागदाची बचत करण्यासाठी मंडळाने डिजिटल प्रणालीवर भर देण्याचे ठरवले आहे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या छपाईसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि कागदाचा वापर कमी करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आता काळाची पावले ओळखून मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. आगामी काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार असून, कागदाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्यावर मंडळाचा भर असणार आहे.
कागदाचा अवाढव्य वापर थांबवणार
केवळ बारावीच्या परीक्षेचा विचार केला, तर प्रश्नपत्रिकांच्या छपाईसाठी तब्बल 10.72 कोटी पृष्ठे लागतात. नमुना उत्तरपत्रिकांसाठी 19.29 लाख पृष्ठे खर्च होतात. एकूण छपाईचा आकडा 10.92 कोटी पृष्ठांच्या घरात जातो, ज्यासाठी साधारण 223 मेट्रिक टन कागद लागतो. याशिवाय, 1.06 कोटी पेक्षा अधिक उत्तरपत्रिकांच्या छपाईसाठी 1700 मेट्रिक टन कागद वापरला जातो. हा अवाढव्य खर्च आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी डिजिटल प्रणाली स्वीकारणे हाच उत्तम पर्याय असल्याचे मंडळाचे मत आहे.
प्रमाणपत्रातही होणार बदल
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी आणि शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित स्वरूपात दिले जाणार असून, त्यावर विद्यार्थ्याचे नाव आधार कार्डावरील नोंदीप्रमाणे असेल. तसेच यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र आणि बारकोडचा समावेश असेल, ज्यामुळे सुरक्षितता वाढेल. विशेष म्हणजे, ही प्रमाणपत्रे निकालानंतर केवळ 15 दिवसांत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
Kalyan News : लाडकी बहीण योजनेच्या KYC च्या नावाखाली घृणास्पद प्रकार; महिलांना सावध राहण्याचं आवाहन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world