अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Maharashtra Heat Wave Alert: महाराष्ट्रात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होणार असून पुढील पाच दिवस राज्यासाठी अत्यंत कठीण असणार आहेत. पुणे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रावर मोठं संकट.. 5 दिवस महत्त्वाचे
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने आणि कोरड्या हवामानामुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. अकोल्यात आज ४३ अंश तापमानाची नोंद झाली असून, येत्या दोन दिवसांत हेच तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचू शकते. अमरावतीमध्येही हीच स्थिती असून तिथेही पारा ४५ अंशांवर जाण्याची भीती आहे. केवळ विदर्भच नव्हे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही सरासरी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.
वाढत्या उन्हामुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका सर्वाधिक असल्याने, तातडीचे काम असल्याशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी दोन दिवसांनंतर 'यलो अलर्ट' जारी केला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिकांनाही फटका बसण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सिंचनाचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
काय काळजी घ्यावी?
- हायड्रेशन: शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, लिंबू सरबत, नारळ पाणी, कोकम सरबत प्या
- आहार: पचायला हलका आहार घ्या, मसालेदार आणि जंक फूड टाळा
- त्वचा व डोळे: बाहेर पडताना सनस्क्रीन (SPF) लावा, डोळ्यांच्या सुरक्षेसाठी सनग्लासेस (गॉगल) वापरा
- कपडे: फिकट रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा जे उष्णता शोषून घेत नाहीत
- घराची काळजी: दुपारी खिडक्या-दरवाजे बंद ठेवून पडदे लावून ठेवा, जेणेकरून उष्ण हवा आत येणार नाही
- उष्माघात टाळा: चक्कर आल्यासारखे वाटल्यास सावलीत बसा आणि ओल्या कपड्याने शरीर पुसून घ्या
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world