Maharashtra Vidhan Parishad Election 2026: राज्यातील स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीचे नाट्य घडले. कुठे बंड शमवण्यात नेत्यांना यश आलं, तर कुठे ऐनवेळी उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत. या सर्व घडामोडींनंतर 17 पैकी 5 जागांवर निकाल आधीच स्पष्ट झाला असून उर्वरित 12 जागांवर आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे.
पाच जागी गुलाल उधळला; महायुतीचे वर्चस्व
निवडणुकीच्या रिंगणातून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने 5 जागांवर बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीने बाजी मारली असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी उमेदवारांचा यात समावेश आहे. प्रामुख्याने कोकण, पुणे आणि ठाणे या महत्त्वाच्या पट्ट्यात महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
बिनविरोध विजयी झालेले उमेदवार
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर: अरुण लखाणी (भाजप)
पुणे: विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ठाणे: रवींद्र फाटक (शिवसेना)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
यवतमाळ: दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
( नक्की वाचा : Eknath Shinde : परभणीत शिंदेंची शिवसेना बदलली? 'बाण' आणि 'खान एकत्र! काय आहे कारण? )
कोकणात हायव्होल्टेज ड्रामा
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सर्वात जास्त चर्चा रंगली ती बाळ माने यांच्या माघारीची. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने चक्क भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले. या धक्कादायक प्रकारानंतर बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
नाशिक आणि पुण्यात काय घडलं?
पुण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले. दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र पेच कायम आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यासमोर भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी आपले आव्हान कायम ठेवल्याने येथे आता चुरशीची लढत होणार आहे. नाशिकचा हा मतदारसंघ महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
( नक्की वाचा : Sanjay Raut: मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता काय घडणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने नाशिकचे राजकारण तापले )
12 जागांवर आता आमने-सामने लढत
बिनविरोध जागा वगळता आता उर्वरित 12 जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी महायुती आणि मविआचे दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अनेक ठिकाणी अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
प्रमुख मतदारसंघातील मुख्य लढती
सोलापूर: राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी शरद पवार गट)
नागपूर: डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)
सांगली-सातारा: धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गट)
नांदेड: अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)
छत्रपती संभाजीनगर: सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (शिवसेना (उबाठा))
या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाची कसोटी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालांचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world