Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयावरुन राज्यभरातील मराठीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफी तसेच लाडकी बहीणचा मुद्दाही चर्चेत आहे. यावरुनच उद्यापासून सुरु होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून (ता. 30 जून) राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. दुसरीकडे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राज्यामध्ये हिंदीवादाला तोंड फुटलं आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने यासंदर्भातील जीआर प्रसिद्ध करून स्वत:लाच अडचणीत आणले आहे. सरकारने घेतलेल्या पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या निर्णयाविरोधात मनसे, ठाकरे गटासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्ग, कर्जमाफी, लाडकी बहीण आदी मुद्देही चर्चेत आहेत.
शक्तीपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ विरोधात कोल्हापूरसह बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येत्या १ जुलै रोजी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाचीही घोषणा केली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर या मुद्द्यावरुनही विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
नक्की वाचा - Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर
दरम्यान, हिंदीचा वाद, शक्तिपीठ महामार्ग, कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला घेरण्यासाठी विरोधक रणनिती आखणार आहेत. याचबाबत विरोधकांची एक बैठक पार पडणार आहे. थोडक्यात, उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आक्रमक भूमिकांमुळे सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.