Local Body Elections: राज्यात होऊ घातलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्व बाजूंचा विचार आणि कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
या स्पष्टीकरणानुसार, 24 नगरपालिकांमधील नगराध्यक्ष आणि सुमारे 150 सदस्यांसाठीच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत आणि या निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगानं काय सांगितलं?
आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 17 (1) (ब) नुसार, जर एखाद्या उमेदवाराने निवडणुकीच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील केले असेल, तर त्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे आवश्यक होते.
हा आवश्यक वेळ दिला गेला नसता, तर संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित करण्याची वेळ आली असती. या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करण्यासाठीच ठराविक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोगाने दिली आहे. ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्यांना नियम 'क' आणि 'ड' नुसार पुरेसा वेळ देण्यात आला आहे आणि त्यामुळे या स्थगित निवडणुका देखील 20 डिसेंबरला घेण्यात येणार आहेत.
( नक्की वाचा : Local Body Elections: झेडपी-मनपा आरक्षण पुन्हा! निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय, वाचा सविस्तर )
प्रचार खर्चावर लवकरच निर्णय
24 नगरपालिकांमधील नगराध्यक्ष आणि सुमारे 150 सदस्यांच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचार खर्चाचा निर्णय सध्या राज्य निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे. याबाबत आयोग लवकरच निर्णय जाहीर करेल. या संदर्भात, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी (1 डिसेंबर) एक बैठक देखील पार पडली आहे.
या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जनतेमधून निवड होणार आहे, त्यामुळे या पदासाठी एकदाच मतदान होईल. मात्र, काही प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे, त्या प्रभागातील निवडणुकांसाठी नागरिकांना दुसऱ्यांदा मतदान करावे लागणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस
ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तेथील 24 निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची तयारी आयोगाने केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना नव्याने अर्ज भरता येणार नाही. त्यांना केवळ अर्ज मागे घेता येईल. तसेच, आवश्यकतेनुसार चिन्ह वाटप केले जाईल.