अहमदनगर: राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे आगामी निवडणुकींची मोर्चेबांधणी सुरु असतानाच राज्यातील काँग्रेस मात्र अद्याप सायलेंट मोडवरच असल्याचे दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नियुक्त्याच रखडल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातही अद्याप काँग्रेसचे संघटन नियुक्त्या रखडल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सत्ता गेल्यानंतर विस्कळीत झालेल्या जिल्हा काँग्रेस संघटनेच्या पुनर्बांधणीस अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. नगर जिल्ह्यामध्ये शहर जिल्हाध्यक्षासह काही तालुक्यांतील अध्यक्षपदही अद्याप रिक्त आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दौरा सुरू केला. मात्र, हा दौरा अपूर्णच राहिला
रिक्त जागांवर पदाधिकारी केव्हा नियुक्त केले जातात, याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील असे दोन अस्तित्वात असताना पक्ष मजबूत होता. पक्ष कार्यकर्त्याचे जिल्हाभर जाळे होते. मात्र राधाकृष्ण विखे यांनी पक्ष सोडताना त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्षासह प्रमुख पदाधिकारीही भाजपमध्ये गेले.
राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्ह्यात पक्ष संघटनेची एकहाती धुरा माजी मंत्री थोरात यांच्यावर पडली. मात्र, त्यांनी नियुक्त केलेले ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी लागोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.त्यामुळं ही पद अजूनही रिक्त आहेत. त्यामुळेच या रिक्त पदांवर नियुक्त्या कधी होणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तसेच पक्षबांधणीचे मोठे आव्हानही बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे.