भिवंडी, ठाणे, पालघरमध्ये कोसळधार; कुठे पूल तर कुठे भाजी मार्केट पाण्याखाली 

Maharashtra Rain Update: ठाणे आणि शेजारील पालघर जिल्ह्यामध्ये बुधवारी (19 जून) रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील ठाणे आणि शेजारील पालघर जिल्ह्यामध्ये बुधवारी (19 जून) रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. डोंबिवली, भिवंडी, कल्याण आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेल अलर्ट जारी केलाय. त्यामुळे गुरुवारी (20 जून) येथे मूसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघरमधील सूर्या नदीला पूर आल्याने मनोरमधील एक पूल पाण्याखाली गेला. जोरदार पावसामुळे वाडा आणि मनोर दरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी पीटीआयला दिली आहे.   

भारतीय हवामान विभागाने (IMD) पालघर जिल्ह्यासाठी सकाळी 10 वाजता रेड अलर्ट जारी केला असून पुढील तीन तासांत जोरदार पावसाचा अंदाज आहे, असेही कदम यांनी सांगितले. 

पालघर :

पालघरमधील पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे डहाणुतील वनई - चंद्रनगर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. वनई चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. पालघर जिल्ह्यात रात्रीपासून धुवांधार पाऊस सुरू झाला असून आताही पावसाचा जोर कायम आहे. देहर्जा नदीवर तात्पुरता बांधण्यात आलेला रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. मनोर-वाडा महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. नागरिक जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत.  

ठाणे :

ठाणे शहरातही रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. 24 तासांमध्ये शहरात 35.51 मिमी पाऊस झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.

Advertisement

तर गुरुवारी (20 जून) सकाळी 8.30 वाजेपासून ते सकाळी 9.30 वाजेपर्यंत शहरात 26.42 मिमी पाऊस झाल्याचे तडवी यांनी सांगितले. ठाणे शहरामध्ये या पावसाळ्यामध्ये आतापर्यंत 228.93 मिमी पाऊस झाला आहे, गेल्या वर्षी याच कालावधीदरम्यान 50.70 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. 

भिवंडी : 

भिवंडीमध्येही मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भाजी मार्केट देखील पाण्याखाली गेले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नालेसफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

Advertisement

कल्याण : 

कल्याण- डोंबिवली परिसरातही सकाळपासून पावसाने जोर धरला आहे.  मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेकडील श्री. कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, धनश्री कॉलनी जलमय झाली आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाई वरवर केल्याचे दिसत आहे. तसेच येथील नाला देखील चुकीच्या पद्धतीने बांधल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कॉलनीमध्ये पाणी शिरल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. उल्हासनगरमधील रस्त्यांवरही पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने सुरू आहे. 

Advertisement

Palghar Rain | पालघरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, देहर्जा नदीवर बनवलेला रस्ता पाण्याखाली; वाहतूक ठप्प