अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत आहे. उन्हाचा तडाखा वाढत असतानाच आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचा तापमानाचा पारा 40 च्या पुढे राहणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.
Fraud Case: उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न भंगलं, 2 कोटीही गेले! गडचिरोलीच्या तरुणाला पुण्यात गंडा
पुढील 4 दिवस धोक्याचे, महाराष्ट्रावर दुहेरी संकट
याबाबत सविस्तर माहिती अशी की ऐन उन्हाळ्यात राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
काही ठिकाणी गारपीट होऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये सातारा, सांगली, सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह लातूर, धाराशिव, बीड आणि परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळमध्येही पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे.
उन्हाचा तडाखा वाढणार, विदर्भ होरपळणार!
दुसरीकडे, विदर्भातील सूर्य आग ओकत असून तेथे तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. "वाढत्या तापमानामुळे स्थानिक पातळीवर अस्थिरता निर्माण होऊन ढग दाटून येण्याची प्रक्रिया वेगवान होत आहे," असे सानप यांनी नमूद केले. नागरिकांनी विजा कडाडत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.
Viral Story: ना कंटेट क्रिएटर, ना व्लॉगर.. तरीही 'Youtubeचं गाव' प्रसिद्ध, असं नाव का पडलं?