अखेरच्या टप्प्यात मनोज जरांगेंनी डाव टाकला! भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते, छगन भुजबळ यांच्या येवल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना महत्वाचे आवाहनही केले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

निलेश वाघ, येवला: राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असल्याने राज्यभरात दिग्गजांच्या सभांचा धडाका सुरु आहे. एकीकडे राजकीय वर्तुळात प्रचार जोर धरत असतानाच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा डावपेच आखायला सुरुवात केली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते, छगन भुजबळ यांच्या येवल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी जरांगे पाटील यांनी सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाचा लढा सुरु करणार असल्याची घोषणाही केली. 

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

'ही सांत्वनपर भेट आहे. पण जाताना आता रस्त्यात गावे आहेत ते बाजूला सारू का? मी  कोणाला पाडा हे सांगायला आलो नाही.  मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्या पाडा. यानंतर आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष? येवल्यात विशेष काही नाही, येवला काही राज्याच्या बाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओटात एक अस काही नाही. मी ठरवले तर डायरेक्ट कार्यक्रम करतो, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

नक्की वाचा: भयंकर अपघातात कुटुंब संपलं, नवरा-नवरीसह ७ जण ठार, लग्नघरात शोककळा

या दौऱ्यादरम्यान अंदरसुलला येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या जनसमुदयाला संबोधित करताना जरांगेंनी मोठी घोषणा केली. सरकार स्थापन केल्यानंतर तारीख ठरवू. सरकार स्थापन करु द्या, मजा करु  द्या. मग त्यांच्यासमोर मी मोठा राक्षस आहेच. आरक्षण घ्यायचं आहे. माझा जीव आरक्षणात आहे. खूप शरिराच्या वेदना आहेत, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, असं ंमनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगेंच्या या विधानानंतर जनसमुदाय स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाला. 

Advertisement

महत्वाची बातमी: 'नरेंद्र मोदींची मेमरी लॉस' राहुल गांधींचा हल्लाबोल