Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एकीकडे संथ गतीने सुरू असताना आता दुसरीकडे भाषेचा नवा वाद उफाळून आला आहे. महामार्ग प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लावलेल्या दिशादर्शक आणि सूचना फलकांवरून मराठी भाषा गायब झाली असून, केवळ हिंदी भाषेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे रायगडमधील भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हिंदी फलकांवरून संताप
आगरी-कोळी बांधवांची मोठी वस्ती असलेल्या पेण, वडखळ आणि डोलवी या भागातील महामार्गावर प्राधिकरणाने नुकतेच भव्य फलक लावले आहेत. या फलकांवर 'गलत दिशा मे वाहन ना चलाए..' आणि 'लेन मे वाहन चलाए..' अशा हिंदीतून सूचना लिहिल्या आहेत. महाराष्ट्रात असूनही आणि स्थानिक भाषा मराठी असतानाही हिंदीची सक्ती केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
(नक्की वाचा- Pandharpur-Tirupati Train: विठूरायाची पंढरी तिरुपतीशी जोडली! 16 मेपासून नियमित रेल्वे धावणार, वाचा टाईमटेबल)
स्थानिकांचा आणि शिवसेवेचा इशारा
दैनिक 'सामना'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या विषयाने राजकीय वळण घेतले आहे. "आमच्या भागात हिंदी लादण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही. हे हिंदी फलक तात्काळ हटवून त्या ठिकाणी मराठी फलक लावावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर दिले जाईल," असा इशारा शिवसेना आणि स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. 'सामना'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Ashok Kharat: भोंदू खरातचं बँक लॉकर पाहून ईडीचे अधिकारीही थक्क! काय-काय सापडलं?)
काँग्रेसही आक्रमक
या मुद्द्यावर काँग्रेसनेही कडक शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले की, "रायगडमध्ये आगरी-कोळी आणि मराठी बांधव राहतात. त्यांची बोलीभाषा मराठी असताना हिंदीचा वापर करणे हा मराठीचा अपमान आहे. हा अपमान रायगडचे नागरिक सहन करणार नाहीत", असा इशारा काँग्रेसने दिला आहे.