शुभम बायस्कार, अमरावती: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसह एकूण 17 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांचं गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केल आहे. ८ जूनपासून त्यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती चांगलीच खालावली असून त्यांची भेट घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड आले होते. यावेळी संजय राठोड यांच्यासमोर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
"शासनाचा मंत्री म्हणून बच्चू कडूंचा मित्र म्हणून मी बच्चू कडूंना भेटायला आलो आहे. बच्चू कडूंना आम्ही सहकारी समजतो. बच्चू कडूंच्या उपोषणावर शासनाचे लक्ष आहे. बच्चू कडूंना विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत हा विषय बोलणार आहे. बच्चू कडूंच्या सगळ्या मागण्यांवर मंगळवारी कॅबिनेटमध्ये चर्चा करू. बच्चू कडूंच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या अशी विनंती करणार आहे. आपली गरज महाराष्ट्राला आहे. आपण उपोषण मागे घ्यावे, आपल्या सहकाऱ्यांना उपोषण मागे घेण्यासाठी सांगावं," अशी विनंती यावेळी संजय राठोड यांनी केली.
मंत्री संजय राठोड यांची ही मागणी बच्चू कडू यांनी फेटाळून लावली. सरकारने आमच्या अंतयात्रेची तयारी करावी. सरकारने निर्णय करावा, आमच्या उपोषण सोडण्यापेक्षा निर्णय करण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करावा, असे म्हणत बच्चू कडू उपोषण सुरु ठेवण्यावर ठाम राहिले. यावेळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
Bachchu Kadu Protest: बच्चू कडूंचे मरण बघायचे आहे का? संभाजीराजे छत्रपतींनी कृषिमंत्र्यांना झापलं
दरम्यान, प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विंचूर - प्रकाशा महामार्गावरील सटाण्याच्या ढोलबारे येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.सुमारे दिड तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाले होते.अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात वाहतूक सुरळीत केली.