Monsoon Update 2026: केरळच्या मार्गाने भारतात दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून एकाच ठिकाणी स्थिरावला आहे. सुरुवातीच्या आठवड्यात वेगाने पुढे सरकल्यानंतर हा पाऊस अचानक थबकला असून, महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईमध्ये मान्सून येण्यास मोठा उशीर होत आहे. दरवर्षी सामान्यतः 11 जून रोजी मुंबईत पोहोचणारा पाऊस यंदा अनेक दिवस उलटून गेले तरी अजूनही आलेला नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील काही विशिष्ट हवामान बदलांमुळे मान्सूनची गती मंदावली आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली आहे.
मान्सून रखडण्याचे मुख्य कारण काय?
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचा वेग कमी होण्यामागे सोमाली जेट ही वारे प्रणाली कमकुवत होणे हे सर्वात मोठे कारण आहे. सोमाली जेट म्हणजे हिंदी महासागरात आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीजवळ निर्माण होणारा कमी पातळीवरील हवेचा प्रवाह आहे. हा प्रवाह दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या वाऱ्यांना भारताच्या मुख्य भूभागाकडे खेचून आणण्याचे काम करतो. या प्रणालीला फाइंडलेटर जेट असेही म्हणतात. यंदा हे सोमाली जेट अपेक्षेप्रमाणे मजबूत न झाल्यामुळे मान्सूनला महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेला जोर मिळालेला नाही.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचा अभाव
पावसाची गती मंदावण्याला बंगालच्या उपसागरातील स्थिती देखील कारणीभूत आहे. मान्सूनला पुढे खेचण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार होणे आवश्यक असते. मात्र, जून 2026 मध्ये प्रशांत महासागरात आलेल्या चक्रीवादळांचे अवशेष बंगालच्या उपसागरात ही प्रणाली मजबूत करू शकले नाहीत. त्यामुळे मान्सूनचे वारे मुख्य क्षेत्राकडे वळण्याऐवजी पूर्वेकडील राज्यांकडे वळाले आहेत. परिणामी महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकलेले नाही.
( नक्की वाचा : Monsoon Update: उकाड्यापासून लवकरच सुटका! मुंबईकरांनो छत्री काढून ठेवा, मान्सूनबाबत हवामान विभागाची नवीन घोषणा )
देशात सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पाऊस
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, 1 जून ते 18 जून दरम्यान देशात सरासरीच्या तुलनेत 40 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. या काळात देशात सरासरी 80.6 मिलीमीटर पाऊस होतो, परंतु यंदा केवळ 48.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारत क्षेत्रात तर परिस्थिती अधिक चिंताजनक असून, या भागात सरासरीपेक्षा तब्बल 63 टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. मुंबईत मान्सून येण्याची तारीख 11 जून असताना, पुढील सात दिवस मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली आहे.
हवामान शास्त्रज्ञांनी काय सांगितलं?
आयएमडीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी स्पष्ट केले की, सध्या महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी हवामानाची स्थिती अनुकूल नाही. पूर्व भारतातही मान्सूनची गती अत्यंत संथ आहे. तर दुसरीकडे, मेरीलँड विद्यापीठाचे प्राध्यापक रघु मुर्तुगुड्डे यांच्या मते, ही समस्या केवळ हवेतील आर्द्रतेची नाही. वारे वाहत असून ते आर्द्रता देखील आणत आहेत, परंतु वातावरणातील दाबामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया रोखली जात आहे. यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास विस्कळीत झाला आहे.
( नक्की वाचा : Kharif Crop Planning: अल निनोच्या संकटात शेती वाचवणार 'हा' फॉर्म्युला; यंदाच्या खरिपात 'या' पिकांची करा निवड )
पुढील काही दिवसांचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण-पश्चिम मान्सूनची उत्तरी सीमा महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांपर्यंत पोहोचली आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या उर्वरित भागांत मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती हळूहळू अनुकूल होत आहे. त्यानंतरच महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world