मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; ठाणे ते CSMT लोकल सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, लोकलबरोबरच रस्ते वाहतुकीवरही परिणाम

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

गेल्या दोन दिवसांपासून कोकणासह मुंबईत (Mumbai Rain Update) जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहे. याचा फटका लोकल सेवेलाही बसला आहे. आज 8 जुलै रोजी सकाळी कर्जतहून सुटणाऱ्या लोकल गाड्या केवळ (Mumbai Local Update) ठाण्यापर्यंत सुरू आहेत. ठाण्याच्या पुढे भांडूप, (Water Logging at Station) कुर्ला येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने ठाण्याहून पुढे लोकल बंद आहेत. परिणामी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहे. 

मुंबई काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप रेल्वे स्थानकात पाणी साचले असून त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज आठवड्याच्या पहिलाच दिवशी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कामावर जायला निघालेले असताना रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांना याबाबतची माहिती मिळत असून त्यामुळेच बदलापूर रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळतेय.

गेल्या आठवड्याभरापासून कोकणाला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी खडावली-टिटवाळादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळेही लोकल सेवेवर परिणाम झाला होता.

Advertisement

लोकलसेवेव्यतिरिक्त रस्तेमार्गावरही याचा परिणाम दिसत आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्याचंही दिसत आहे.