घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक जॅम विसरा! DCM शिंदेंनी दिली इतक्या दिवसांची डेडलाइन; ठाणेकरांना मोठा दिलासा

Mumbai News: तुम्ही घोडबंदर किंवा एलफिन्स्टन मार्गावरून जाताय? मग ही आनंदाची बातमी वाचायलाच हवी!

जाहिरात
Read Time: 2 mins
"Mumbai News: मुंबई-ठाण्यातील 'या' दोन मोठ्या प्रकल्पांबाबत घेतला मोठा निर्णय"
PTI

Mumbai Development News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यंदा प्रथमच शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 48 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. एमएमआर परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी आणि भविष्यातील पाणी नियोजनासाठी विशेष भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 160 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक झाली.  

नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्राधिकरणाने 17 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील 75 टक्के खर्च हा रस्ते, मेट्रो, उड्डाणपुल, बोगदे, बाह्यमार्ग यासारख्या विकासकामांवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(नक्की वाचा: Mumbai News: महापौर रितू तावडेंकडून कोकणवासियांना मोठं गिफ्ट! मुंबईत मिळणार हक्काचा निवारा, नितेश राणेंचे पत्र)

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘पोशीर' आणि 'शिलार' या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
  • शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 337 किलोमीटर मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. 
  • मेट्रो नेटवर्कसाठी 13 हजार 838 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्ग 4, 6, 5,2 ब आणि मार्ग 12 या प्रकल्पांना वेग द्यावा असे सांगितले. 
  • एमएमआर क्षेत्रातील सर्व प्रमुख मनपांचा मिळून नीती आयोगाच्या मदतीने एक 'बृहद आराखडा' तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
  • लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सेवा तर ठाणे व मीरा-भाईंदर येथे बोट टॅक्सीचा प्रयोग केला जाणार आहे. मेट्रो-बस-जलवाहतूक यांची एकत्रित जोडणी करून प्रवास अधिक जलद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. 
  • वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हर, अंडरग्राउंड टनेलिंग प्रकल्प, कोस्टल रोड आणि भिवंडी-नाशिक मार्गावरील पर्यायी रस्ते उभारले जात आहेत. 
  • ट्रॅफिक ब्लॅकस्पॉट ओळखण्यासाठी स्वतंत्र अभ्यासही करण्यात येणार आहे. 
  • मुंबईतील एलफिन्स्टन पुलाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आणि घोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम महिनाभरात पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.
  • मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून एमएमआरडीएच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर येथील 17 हजार घरांच्या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एसआरएकडून नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 
  • मुंबईत 17 प्रकल्पांची यादी तयार असून  ठाण्यात पाच इमारतींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. रस्ते, मेट्रो, धरण यासोबतच एमएमारडीएच्या माध्यमातून चांगली घरे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Topics mentioned in this article