मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

Mumbai Water Cut: मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. पाणीसाठी अधिकाधिक काळ उपयोगामध्ये यावा या दृष्टीने मुंबई महानगरामध्ये 30 मे 2024 पासून पाच टक्के तर 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकरांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. केवळ सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

नियोजनपूर्वक पाणीपुरवठा

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे 5.64 टक्के पाणीसाठी कमी आहे. शनिवारची (25 मे 2024) आकडेवारी लक्षात घेता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये एकूण 1 लाख 40 हजार 202 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटरच्या तुलनेत सध्या फक्त 9.69 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.

(नक्की वाचा: संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळतंय, निवडणुका संपल्याने सरकारने आता त्याकडे लक्ष द्यावे : नाना पटोले)

भातसा धरणातून 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा धरणातून 91 हजार 130 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. म्हणजे मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तरीही अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा 10 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, असा सर्व बाबींचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

(नक्की वाचा: नाझरे धरणात शून्य पाणी साठा, पुरंदर बारामतीला फटका बसणार?)

जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत पाणी कपात लागू

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि अन्य गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्येही पाच टक्के आणि 10 टक्के कपात लागू राहणार आहे.समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत, ही पाणी कपात लागू राहणार आहे. 

Advertisement

(नक्की वाचा: मनमाडमध्ये पाणीसंकट गंभीर, 30 मेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक)

पाण्याचा अपव्यय टाळावा, या गोष्टी ठेवा लक्षात   

  •  दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, त्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.
  • आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेऊन प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करावी. नळ सुरू ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे. 
  • घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेऊन कामे उरकावीत.
  • वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेऊन ओल्या कापडाने वाहने पुसावे. घरातील फरशी, गॅलरी, व्हरांडा, जिने धुऊन काढण्याऐवजी ओल्या कापडाने पुसून घ्या.
  • आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नये. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास पाण्याचा वापर कमी होऊ शकतो.
  • नळ तसेच वॉश बेसिनचे नळाचा प्रवाह मर्यादित करणारे नोझल (तोटी) बाजारामध्ये उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. नागरिकांसह हॉटेलमध्येही याचाच वापर करावा.
  • हॉटेलमध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन पाणी वाया जाणार नाही.
  • घरांमधील, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करावी.  यामुळे पाण्याची बचतही होईल आणि पाणी दूषित होणार नाही.  छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओव्हरफ्लो होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. 

Maharashtra Drought | महाराष्ट्र नव्हे, दुष्काळ राष्ट्र; धरणं, विहिरी कोरड्याठाक

Topics mentioned in this article