आकाश सावंत
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुगंध दरवळवत संत मदन महाराज बिहाणी यांचा पालखी सोहळा आष्टीतील कडा येथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. गेली 21 वर्षे अखंड सुरू असलेली ‘पहिली महापंगत' परंपरा यंदाही मुस्लीम बांधवांनी तितक्याच भक्तिभावाने जपली. रमजान तांबोळी आणि कांदा व्यापारी बबलूसेंठ तांबोळी यांच्या पुढाकाराने हजारो वारकऱ्यांना महाप्रसादाचा आस्वाद मिळाला. गेल्या 21 वर्षापासून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची या ठिकाणी मुस्लीम बांधव सेवा करतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज गुरूवारी पालखी कड्याच्या मुख्य चौकात पोहोचताच तांबोळी कुटुंबीयांनी मोठा पंगत मंडप उभारून पारंपरिक पदार्थांची रेलचेल मांडली. ‘विठ्ठल विठ्ठल' आणि ‘अल्लाहू अकबर'चे स्वर मिसळताच परिसरात मंगल गजर घुमला. संत बिहाणी संस्थानचे सचिव बाबासाहेब कात्रे, तसेच मौलाना शफीक काझी यांच्यासह दोन्ही धर्मांतील मान्यवरांनी पादुकांचे पूजन करून महापंगतीला सुरुवात केली. तर “भगवा पताका आणि हिरवा फडका या पंगतीत एकत्र फडकत असल्याचे चित्र बघायला मिळाले.
दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी दिंडीबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा येथील दृश्यांनी ठोस प्रतिवाद केला. “जोडी तोडून दाखवा” अशा घोषणांमधून वारकऱ्यांनी मुस्लीम बंधूंना उभारलेल्या या प्रेमपंगतीभोवती ऐक्याचं कवच मजबूत केलं. परंपरेनुसार पादुका सर्वप्रथम महापंगतीच्या पाटावर ठेवून आरती झाली. नंतर वारकरी रांगेने आसनस्थ झाले. अवघ्या पंधरा मिनिटांत दोन हजार भाविकांनी जेवण संपवले. शेवटी टाळ-मृदंगाच्या तालावर ‘हरिनामाचा' गजर सुरू असतानाच पालखी पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाली.
ट्रेंडिंग बातमी - Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?
ही महापंगत परंपरा 2004 साली दिवंगत मुबारक तांबोळी यांनी सुरू केली. ‘वारकऱ्याला माझ्या हातून जेवायला हवे,' या संकल्पाचे पालन आज तिसरी पिढी करते. आयोजनासाठी दोन्ही धर्मांतील तरुण स्वयंपाक, पंगत व स्वच्छता सांभाळतात. त्यामुळे हा पालखी सोहळा धार्मिक उत्सव न राहता सर्वसमावेशक लोकउत्सव ठरतो. प्रशासनाने रस्ते-पाणी सुविधांवर भर द्यावा, अशी मागणीही होत आहे.