प्रविण मुधोळकर, नागपूर: औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडताना पाहायला मिळत आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावरुनच नागपूर शहरामध्ये वादाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले असून दोन गटात दगडफेक, जाळपोळीची घटना घडली. यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून परिसरात छावणीचे स्वरुप आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूरमध्ये काय घडलं?
सोमवारी सकाळी नागपूर शहरामध्ये विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केले होते, त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ज्यामुळे किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास शहरातील शिवाजी चौक तसेच महाल परिसरात मोठा राडा झाल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास बाहेरुन आलेल्या जमावाने दगडफेक केली तसेच गाड्यांची जाळपोळ केली, ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, महाल परिसर तसेच चित्रा टॉकीज भागामध्ये हा राडा झाला. कोणत्याही आंदोलनात सहभागी नसलेल्या सामान्य नागरिकांना याचा त्रास झाला असून दगडफेक करण्यात आली तसेच गाड्या जाळण्यात आल्यात.
दगडफेक, जाळपोळ अन् तणाव...
पोलिसांनी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरला. यावेळी पोलिसांच्या दिशेनेही दगड तसेच विटा फेकण्यात आल्या. समाजकंटकांकडून जेसीबी, क्रेनसह काही वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये काही नागरिकांसह पोलिसही जखमी झालेत.
पोलिसांनी सर्व परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला असून जाळपोळ तसेच दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरु आहे. जिथे जिथे आग लावण्यात आली त्याठिकाणी आग विझवण्यात यश आले आहे. काही भागांमध्ये दगडफेक. घोषणाबाजी तसेच जाळपोळ सुरु असल्याने पोलिसांची मोठी टीम बोलावण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु असून राडा घालणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb News: 'औरंगजेब क्रूर कसा?' कबरीबाहेर व्यवसाय करणाऱ्यांचे काय आहे म्हणणे
CM देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचे आवाहन:
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे फडणवीस म्हणालेत.
नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळ मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.