
औरंगजेबाची समाधी उखडून टाकावी अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांकडून होत आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहे. विश्व हिंदू परिषदेने तर कबर उखडून टाकणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातलं वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर खुलताबाद इथं आहे. या कबरी बाहेर अनेक लोक गेल्या कित्येक वर्षापासून व्यवसाय करत आहेत. तिथल्या व्यवसायिकांना सध्या सुरु असलेल्या या वादा बद्दल काय वाटतं ते NDTV मराठीने जाणून घेतलं. त्यातून या व्यवसायिकांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खुलताबाद इथं औरंजेबाची कबर आहे. या कबरी बाहेर शेख इक्बाल हे गेल्या 30 वर्षापासून व्यवसाय करत आहेत. त्यांचे इथे अत्तर आणि फुलांचे दुकान आहे. गेल्या 300 वर्षा पेक्षा जास्त काळ इथं ही कबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाची कबर जपली होती हा इतिहास आहे, असं इक्बाल सांगतात. त्यामुळे औरंगजेबाची कबरही सांभाळली गेली पाहीजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
औरंगजेबाला क्रूर म्हटलं जातं. पण जो राजा क्रूर असलो तो जास्त काळ राज्य करू शकत नाही. तो दोन चार वर्षात संपतो हे इतिहासाने पाहीलं आहे. पण औरंगजेबाने जवळपास 50 वर्ष राज्य केलं असं ही शेख इक्बला सांगतात. वयाच्या 12 व्या वर्षी औरंगजेबाने बंगालची जबाबदारी ही स्विकारली होती. तो जर क्रूर असता तर इतकी वर्ष तो राज्य करू शकला नसता असं ही ते सांगतात. मात्र सध्या लोकांची डोकी भडकवण्याचं काम सुरू आहे असा आरोप ही त्यांनी केला.
काही राजकारण्यांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना आहे. त्यातून वातावरण खराब केलं जात आहे. सध्या अनेक मुद्दे राज्यात आहेत. त्याकडे दुर्लक्ष कसं होईल यासाठी हा मुद्दा काढला आहे. शिवाय जे लोक कबर बाबत बोलत आहेत त्यांच्याकडे सध्या दुसरा मुद्दा राहीलेला नाही. त्यांना हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा आहे असा आरोप ही इथले व्यवसायिक करत आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा आज उपस्थित केला जात आहे उद्या अन्य कुणाच्या कबरीबाबतही अशीच कुणी भूमीका घेईल ते किती योग्य आहे असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.
औरंगजेबचा 1707 मध्ये अहिल्यानगर येथे मृत्यू झाला. त्यानंतरचा त्याचा मृतदेह खुलताबादला आणला. मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजींच्या शेजारीच असावी असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं, असं इतिहासकार सांगतात. त्यानुसार, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं खुलताबादमध्ये कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world