- नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील गावांमध्ये वाघांची दहशत
- पिपरिया गावात दहा ते पंधरा वाघ एकत्र फिरताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेर्यांत टिपले गेले आहेत
- वाघांच्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री गाव बंद ठेवण्याची वेळ आली आहे
संजय तिवारी
भय इथले संपत नाही. ही उक्ती जर खरोखर कुठे प्रत्यक्षात साकार होत असेल तर ते नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील गावांमध्ये होत आहे. इथे वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता बफर झोनमध्ये असलेल्या नवनवीन गावांत सुद्धा वाघांचे हल्ले सुरू झाले आहेत. ज्या गावांमध्ये वाघ फक्त दिसत आणि निघून जात तिथे सुद्धा हल्ले घडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गाव अक्षरश: बंद ठेवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. गावात मोठ्या प्रमाणात वाघांची दहशत निर्माण झाली आहे.
काळ्याकुट्ट अंधारात वाघांचा वावर जास्त झाला आहे. त्याला समोरून कोणी पाहीले तर काळजात धस्स झाल्या शिवाय राहाणार नाही. नागपूर जिल्ह्यातील पिपरिया गावानजीक वन विभागाने लावलेल्या ए आय कॅमेरा ट्रॅप ने अनेक दृष्ट टिपली आहेत. यात एकटा वाघ नाही. तर त्याच्या सोबत अनेक वाघ एकाच वेळी फिरताना दिसत आहे. AI कॅमेऱ्यात ते टीपले गेले आहेत. या गावचे साठ वर्षीय शेतकरी दिलीप वाळके आजकाल आपल्या स्वतःच्या शेतात जात नाहीत. त्यांना शेतात जायला भीती वाटते. कारण, इथे एक दोन नाही तर दहा ते पंधरा वाघ एकाच वेळी टोळक्याने फिरत आहेत. दिलीप सांगतात की या भागात खूप भीती आहे. कारण या भागात दहा ते पंधरा वाघ आहेत. इथून दीडशे मीटरवर एका बाईला वाघाने मारले. तेव्हापासून या गावामध्ये भीतीचे वातावरण आहे असं त्यांनी सांगितलं.
पेंच टायगर प्रोजेक्ट मधील बफर झोन मधील पिपरिया हे जवळपास 12 हजार लोकवस्तीचं गाव आहे. या गावात आतापर्यंत वाघाने एकावर हल्ला चढविल्याची पहिली घटना घडली आहे. शेतात तूर कापत असलेल्या महिलेचा वाघाने जीव घेतला. त्यामुळे गावातले लोक हादरून गेले आहेत. आधी गावात वाघ दिसायचे पण हल्ला झाल्याची घटना कधी झाली नव्हते. मात्र इथं वाघांची संख्या वाढली आहे. इतके वाघ आहेत म्हटल्यावर दिवस-रात्रीच्या भीतीने देखील परिसीमा गाठली आहे. मृत महिलेचे पती गोपीचंद वघारे सांगतात की इथं खूप भीता आहे. आम्ही दहशतीत जगतोय. वाघाच्या भीतीमुळे लोक कामालाही येत नाहीत. या वाघांचा बंदोबस्त झाला पाहीजे अशी मागणी ते करतात.
इथल्या गावांजवळचा जंगलात वन कर्मचारी देखील एकट्याने जात नाहीत. अशा वेळी इथं आधुनिक लहान ड्रोन द्वारे आजूबाजूच्या परिसरावर आकाशातून नजर ठेवली जाते आहे. या भागात वाघांची संख्या वाढल्याचं वन अधिकारी ही सांगतात. आम्ही मानव आणि वन्य जीव संघर्ष टाळण्याकरिता आमच्यासोबत PRT टीम राहते. त्यांच्यासोबत आम्ही दिवस रात्र वॉच ठेवून असतो. त्यांना मायक्रोफोन दिलेले आहेत. तसेच कार्पेट बंदूक दिलेली आहे.या बंदूकीच्या आवाजाने वन्य प्राणी लांब पळून जातात. जंगलात कॅमेरे आहेत. त्यामुळे वाघाची मुव्हमेंट कळते. ते आम्ही लोकांनी ही सांगतो. त्यानुसार मानव वन्य जीव संघर्ष टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं.
इथे ठिकठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेरे आहेत. आधुनिक सेन्सर अलार्म्स आहेत. वॉच टॉवर वरून कर्मचारी नजर ठेवून आहेत. मात्र, दहशतीत फरक पडलेला नाही. महाराष्ट्राच्या पेंचमध्ये पाच वर्षात 26 जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आता तर ज्या गावांमध्ये कधी हल्ले झाले नाही तिकडे वाघांनी मोर्चे वळवले आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. गावकरी घराबाहेर निघायला तयार नाहीत. गाव बंद करून ठेवण्याची जणू वेळ त्यांच्यावर आली आहे. जीव वाचवायचा असेल तर घरातच थांबा अशी अवस्था त्यांची झाली आहे. त्यामुळे या समस्येपासून गावकऱ्यांची सुटका कशी होणार हा प्रश्न आहे. वन विभागाने यावर कायमचा तोडगा काढणे गरजेचे आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world