Nagpur News : 'नागपूरचं सावजी खाल्लं तर मी एक महिना आजारी पडेन. अशा पद्धतीचं अन्न आपण खातो. जे तेलकट, फॅटी, जास्त साखर आणि मीठयुक्त आहे. असे पदार्थ खाल्ल्याने हॉर्ट अटॅकची भीती असते.' अशा पद्धतीचं वक्तव्य अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावतीच्या कार्यक्रमात केलं होतं. तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यानंतर सावजी पदार्थांबद्दल गैरसमज पसरवला जात असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली आहे.
सावजी बनवण्याची खास पारंपारिक पद्धत आहे. तशा पद्धतीने बनवलं तर ते पोटासाठी त्रासदायक ठरत नाही. मात्र आजकाल जास्त तेल आणि तिखट टाकलं म्हणजे सावजी अशा म्हणत सोशल मीडियावर गैरसमज पसरवला जात असल्याचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं.
सावजी समाज मूळचा कुठला?
सावजी म्हणजे विणकर बनकर (हलबा कोष्टी समाज) समाज. हा समाज मध्यप्रदेशातून नागपुरात स्थलांतरित झाला. याशिवाय काही समाज सोलापूर तर देशातील अनेक भागात स्थलांतरित झाला. सोलापुरात विणकर समाजाच्या चादरी प्रसिद्ध आहेत. सोलापूर आणि सांगलीत गेलेला विणकर समाज लाल तिखटाचा जास्त वापर करतात. त्यामुळे त्यांच्याकडील रस्सा लालसर असतो. नागपुरात मात्र रस्सा काळपट आणि पातळ असतो.
सावजी पदार्थ कसे तयार केले जातात?
महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या सावजीची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. सावजीसाठी मसाले आधी भाजले जातात. त्यानंतर ते मसाले गरम पाण्यात उकळतात आणि त्यानंतर पाटा-वरवंट्यावर वाटतात. म्हणून सावजी मसाल्याचा रस्सा पातळ असतो. मात्र आजकाल सावजी म्हणजे खूप तिखट आणि तेलाचा तवंग असल्याची समज निर्माण झाली आहे. मात्र योग्य पद्धतीने सावजीचा रस्सा तयार केला तर जळजळ होणार नाही. सावजी नक्की छान होईल आणि त्याच्या प्रेमात पडाल. त्यामुळे सावजी म्हणजे तिखट असं निश्चित नाही.