योगेश लाठकर
ऊन्हाचा तडाखा वाढला आहे. नांदेड जिल्ह्यात तर सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारण तापमान हे 43- 44 अंशावर आहे. यामुळे उष्णतेने लाही लाही होत आहे. यातच सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे NDTV मराठीने महावितरणच्या सब स्टेशनला भेट देऊन नेमकी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. वीज ही ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून घराघरा पोहोचते. हे भले मोठे ट्रान्सफॉर्मर महावितरणच्या सब स्टेशनमध्ये असतात. उन्हामुळे हेच ट्रान्सफॉर्मर गरम होत आहे. त्यांना थंड करण्यासाठी चक्क कुलरचा वापर केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हाय व्होल्टेजला वापरा योग्य व्होल्टेजमधे रुपांतरित करण्याचे काम हे ट्रान्सफॉर्मर करतात. वाढलेल्या उन्हामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. सर्वसाधारणपणे सब स्टेशन मधील एक ट्रान्सफॉर्मर 5 MVA या क्षमतेचा असतो. पण सध्या याच ट्रान्सफॉर्मर 8MVA एवढा सरासरी लोड येतोय. या ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे ऑइल असते. या ऑइल चे तापमान 70 अंशाच्या वर गेल्यास विज बंद होते. शिवाय ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित राखण्याचे आव्हान असते.
त्यातून अखंडित विज ग्राहकांना भेटावी हे मोठे आव्हान महावितरण पुढे सध्याच्या परिस्थितीत आहे. शेवटी यासाठी महावितरणने थेट कुलरची मदत घेतली आहे. सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर थंड राहावेत म्हणून एक ट्रासफॉर्मर मागे 2 कूलर लावले आहेत. हे कूलर सकाळी 7 वाजता सुरू केले जातात, आणि सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरूच ठेवले जातात. या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. ट्रान्सफॉर्मरचे तापमान बहुतांश वेळी नियंत्रणात राहत आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होत नाही. तो अविरस सुरू ठेवण्यात मदत होत आहे.
नांदेड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. एखाद्या वेळी तापमान वाढले तर किमान 30 मिनिटे वीज पुरवठा बंद केला जातो. ऊन्हाचा त्रास जसा माणसांना होतो तसा तो ट्रान्सफॉर्मरला ही होत आहे. तापमान 43-44 अंश अन् विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे वीजपुरवठा खंडीत होत आहे. मात्र त्यावर उपाय म्हणून ट्रान्सफॉर्मरसाठी कुलर वापरला जात आहेत. त्यातून काही अंशी चांगला परिणाम दिसून येत आहे. हा प्रयोग उन्हाची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचं महावितरण ने स्पष्ट केलं आहे.