राहुल वाघ, नाशिक:
Nashik Godaghat Closed: नाशिकचे प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या गोदाघाट परिसरातील मुख्य घाट आजपासून पुढील दोन महिन्यांसाठी सर्वसामान्य नागरिक आणि भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मनपाच्या महत्त्वाकांक्षी 'रामकाल पथ' प्रकल्पांतर्गत घाटांचे सुशोभीकरण आणि विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने हा प्रतिबंध घालण्यात आला आहे. येत्या १६ जुलै २०२६ पर्यंत घाटांवर प्रवेशबंदी लागू राहणार असून, या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने केले आहे.
गोदाघाट परिसरातील मुख्य घाट बंद
गोदाघाटावर दररोज शेकडो नागरिक धार्मिक विधी तसेच अस्थी विसर्जन आणि स्नानासाठी येत असतात. या कामांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने चोख पर्यायी व्यवस्था केली आहे. दशक्रिया आणि इतर धार्मिक विधींसाठी 'यशवंत महाराज पटांगण' आणि 'भाजी पटांगण' येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, पिंडदान आणि पवित्र स्नान विधीसाठी भाविकांना 'गांधी तलाव' या पर्यायी सुविधेचा वापर करता येणार आहे.
परंपरेनुसार केल्या जाणाऱ्या अस्थी विसर्जनाबाबत प्रशासनाने कडक सूचना जारी केल्या आहेत. घाटाच्या मुख्य भागात कुठेही अस्थी विसर्जन न करता, त्यासाठी केवळ निश्चित केलेल्या 'अस्थी कुंडाचाच' वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विकासकामांचा वेग आणि सुरक्षितता लक्षात घेऊन नागरिकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा >>NEET पेपरफुटीचं लातूर-पुणे कनेक्शन नेमकं काय? पी.व्ही.कुलकर्णी खरा मास्टरमाईंड? वाचा INSIDE STORY
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world