मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार, तणावामुळे परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

Malegaon Firing News: मालेगावामध्ये माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

- निलेश वाघ

Malegaon Firing News:  मालेगावच्या झोडगे परिसरातील पेट्रोल पंपवर झालेली गोळीबाराची घटना ताजी असतानाच रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालेगावाचे माजी महापौर आणि एमआयएम पक्षाचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा (Badul Malik Yunus Isa) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे मालेगाव शहर हादरले आहे. हल्ल्यामध्ये मलिक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी नाशिकला हलवण्यात आले आहे.
    
मालेगावमध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. रविवारी मध्यरात्री (26 मे 2024) 12  ते 1 वाजेदरम्यान मालेगावातील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गजवळ माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसले होते. याचवेळेस बाइकवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर अगदी जवळून तीन वेळा गोळ्या झाडल्या व फरार झाले. या हल्ल्यात मलिकांच्या हात-पाय आणि बरगडीला गोळी लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नाशिकमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा: थरकाप उडवणारा अपघात CCTVमध्ये कैद, तिला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने गमावला जीव)

घटनेची माहिती मिळताच मालेगावातील MIMचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी घटनास्थळी भेट देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आरोपही आमदार मुफ्ती यांनी केला.

Advertisement

(नक्की वाचा: धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघातामुळे दोन दिवसात 4 बळी)

दरम्यान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. इस्माईल म्हणाले की,"गेल्या काही दिवसांमध्ये मालेगावमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आज माजी महापौरांवर अशा पद्धतीने हल्ला होत असेल तर मग शहरवासीयही सुरक्षित नाहीत. मलिक यांच्यावर गोळीबार करणारे इतके निडर होते की त्यांनी चेहरा देखील झाकला नव्हता. अगदी जवळून त्यांच्यावर तीन वेळा हल्ला केला."   

Advertisement

(नक्की वाचा: अवकाळी पावसात संपूर्ण घर कोसळलं; सरकारकडून मदत न मिळाल्याने निराश कुटुंब प्रमुखाची आत्महत्या)

हल्ल्यामागील ठोस कारण समोर आलेली नाही. पण राजकीय वादातून गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वीही मालेगावात राजकीय वादातून नेत्यांवर गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मालेगावात दोन महिन्यांत गोळीबाराच्या पाच घटना घडल्या आहेत. शहरात वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वर्षभरात पोलिसांनी अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्यांविरोधातही मोहीम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान 37 जणांविरोधात गुन्हे दाखल करत 25 गावठी पिस्तुल आणि 31 जिवंत काडतुसही जप्त करण्यात आले आहेत.  

Advertisement
Topics mentioned in this article