निलेश वाघ, नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांची मालिका सुरु आहे. शुक्रवारी बीडमध्ये एका मद्यधुंद कंटेनर चालकाने बेधुंदपणे वाहन चालवत 15 जणांना उडवल्याची घटना घडली होती. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची बातमी ताजी असतानाच नाशिकमध्ये एक भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघांना जीव गमवावा लागला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव–चाळीसगाव रस्त्यावरील ' सानप ' खाजगी बाजार समितीसमोर शुक्रवारी सायंकाळी ईर्टिगा कार आणि मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत..अपघातातील तिघे मृत व्यक्ती हे निफाड तालुक्यातील जळगाव येथील असून, जखमींवर निफाड आणि नाशिक येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नांदगाव तालुक्यातील कासारी येथील लग्नसोहळा उरकून परतत असतांना हा अपघात घडला..घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलिस करीत आहे.
दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या बिलसवाडी गावाजवळ आयशर ट्रकचा अपघात झाला असून या अपघातात 15 पेक्षा अधिक मजूर जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे . मुक्ताईनगर कडून रावेर कडे मजुरांना घेऊन जात असताना बिलसवाडी गावाजवळ आयशर ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला असून अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी मदत कार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे.